प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी २५ जानेवारी रोजी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १३९ जणांना पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ७ जणांना पद्मविभूषण, १९ जणांना पद्मभूषण आणि ११३ जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मात्र या पद्म पुरस्कारांच्या घोषणेनंतर प्रसिद्ध गायक सोनू निगमने(Sonu Nigam) नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत त्याने या पुरस्कारांबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. किशोर कुमार, अल्का याज्ञिक, श्रेया घोषाल, सुनिधी चौहान यांसारख्या गायक-गायिकांना अद्याप पद्म पुरस्कार का दिला गेला नाही, असा सवाल त्याने या विडिओच्या माध्यमातून केला आहे. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोनू निगमने या व्हिडिओच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अनेक गायकांना त्यांच्या कामाची पोचपावती न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. ज्यांनी संपूर्ण जगातील गायकांना प्रेरणा दिली आहे ते मोहम्मद रफी साहब त्यांना आपण पद्मश्रीवरच संपवलं आहेत. आणि एक आहेत, ज्यांच्या नशिबी पद्मश्रीसुद्धा नाही. ते म्हणजे किशोर कुमारजी. त्याचप्रमाणे आता जे आहेत त्यापैकी अल्का याज्ञिकजी.. ज्यांचं करिअर इतकं मोठं आणि कमालीचं आहे. त्यांना आतापर्यंत काहीच मिळालं नाही. श्रेया घोषालसुद्धा बऱ्याच काळापासून आपल्या कलेद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकतेय. तिलासुद्धा पुरस्कार मिळाला पाहिजे. सुनिधी चौहानने तिच्या वेगळ्या आवाजाने एका संपूर्ण पिढीला प्रेरणा दिली आहे. तिलासुद्धा आतापर्यंत काहीच मिळालं नाही. गायन असो, अभिनय असो किंवा विज्ञान असो.. इतरही क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना न्याय मिळाला नाही असं तुम्हाला वाटत असेल तर, त्यांची नावं कमेंट्समध्ये लिहा, असे सोनू निगमने आपल्या पोस्ट मध्ये सांगितले आहे.
यावर अनेक नेटकऱ्यांनी त्याला कमेंट्स करत विविध कलाकारांची नावं लिहिली आहेत. दिवंगत गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचा मुलगा बाप्पा लहरीनेही कमेंट करत नाराजी व्यक्त केली. ‘बरोबर बोललात सोनू निगम सर. भारतीय संगीताचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या आणि जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करणाऱ्या माझ्या वडिलांसारख्या व्यक्तीला तो पुरस्कार कधीच मिळाला नाही, हे खरोखरच निराशाजनक आणि अन्याय आहे. ते फक्त एक संगीत दिग्दर्शकच नव्हे तर ट्रेंड सेटरसुद्धा होते. त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती कधीच मिळाली नाही. संगीतासाठी आपलं जीवन अर्पण करणाऱ्या व्यक्तीला मान्यता मिळत नाही हे पाहून खूप वाईट वाटतं. परंतु त्यांचा वारसा हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा जास्त बोलका आहे’, असं त्याने लिहिलंय.
हे ही वाचा :
Mobile Forensic Van सुरू करणारे Maharashtra देशातील पहिले राज्य- CM Devendra Fadnavis