महामारीच्या ‘त्या’ भीषण काळाचे दर्शन घडवणारा ‘अनलॉक जिंदगी’ लवकरच चित्रपटगृहात झळकणार आहे. आता सगळे सुरळीत झाले असते तरी त्या दिवसांच्या आठवणीनेही आजही अंगावर काटा येतो. या काळातील खूप गोष्टी नकारात्मक असल्या तरी या काळात काही गोष्टी साकारात्मकही घडल्या. या काळाने अनेकांना नात्याचे मूल्य पटवून दिले, अनेकांची विचारसरणी बदलवली, मनात निःस्वार्थी भावना जागवली. हे सगळं आपल्याला रियल रील्स प्रस्तुत, राजेश गुप्ता निर्मित, दिग्दर्शित ‘अनलॉक जिंदगी’मध्ये पाहायला मिळणार आहे. एक कौटुंबिक चित्रपट असणाऱ्या ‘अनलॉक जिंदगी’मधील गाणीही अतिशय श्रवणीय असून प्रत्येक गाण्यातून काहीतरी भावना व्यक्त होताना दिसतेय.
‘दिल तुम्हारा हो गया’ या आनंदी जोशीच्या आवाजातील प्रेमगीताला राजेश गुप्ता यांनी शब्दबद्ध केले आहे. शिवानी सुर्वे आणि पितोबाश त्रिपाठी यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात दोघांच्या हळुवार सुरु झालेल्या प्रेमकहाणीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. तर नुसरत फतेह अली खान यांचे बोल लाभलेल्या ‘सादगी तो हमारी जरा’ या गाण्याला दिव्यकुमार यांचा आवाज लाभला आहे. शिवानी सुर्वे आणि पितोबाश त्रिपाठी यांच्या नात्यातील दुरावा, तगमग या गाण्यातून व्यक्त होताना दिसतेय. तर कैलास खेर यांच्या आवाजातील ‘अब तो थम जा रे पगले’ हे भावनिक गाणे राजेश गुप्ता यांनी लिहिले आहे. राजेश गुप्ता, इंदिरा कृष्णा, हेमल इंगळे यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यातून त्यांच्या मनातील घालमेल दिसतेय. या तिन्ही गाण्यांना रोहित नागभिडे यांचे संगीत लाभले असून चित्रपटातील प्रत्येक गाणे त्या क्षणाला साजेसे आहे. ज्याप्रमाणे चित्रपटाच्या ट्रेलरला प्रतिसाद मिळालाय तसाच उत्स्फूर्त प्रतिसाद चित्रपटातील गाण्यांनाही मिळतोय.
View this post on Instagram
दिग्दर्शक आणि निर्माते राजेश गुप्ता म्हणतात, ” संगीताची एक जबरदस्त टीम या चित्रपटाला लाभली असून ही गाणी थेट मनाला भिडणारी आहेत. चित्रपटाबरोबरच गाणीही रसिकांना नक्कीच आवडतील. येत्या १९ मे रोजी चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा.” अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावणाऱ्या या चित्रपटात पितोबाश त्रिपाठी, राजेश गुप्ता, देविका दफ्तरदार, शिवानी सुर्वे, इंदिरा कृष्णा, हेमल देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर ‘अनलॉक जिंदगी’चे लेखन आणि संवाद राजेश गुप्ता यांचे आहेत.
हे ही वाचा :
युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली
राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना
Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत