Holi 2025: हिंदू सणांपैकी अत्यंत महत्वाचा सण म्हणजे होळी. हिंदू पंचांगानुसार, फाल्गुन मासातील पौर्णिमा ही होळी पौर्णिमा किंवा हुताशनी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या दिवशी संपूर्ण भारतात होलिका दहन केले जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन साजरे केले जाते. होळीचा सण देशभरात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. पौर्णिमेच्या संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो. या सणाला डोल पौर्णिमा, धुलवड, मांजल कुळी, उकुळी, फगवा किंवा शिमगा, असेही म्हणतात. परंतु, यंदाची होळी १३ मार्चला आहे की १४ मार्चला, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर या बातमीच्या माध्यमातून त्याचे उत्तर आपण जाणून घेऊ…
होलिका दहनाचा शुभ मुहूर्त
१३ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजून ३६ मिनिटांपासून ते या दिवशी रात्री ११ वाजून २९ मिनिटांपर्यंत भद्रा काळ असेल. या काळात होलिका दहन करणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे होलिका दहनाचा शुभ मुहूर्त १३ मार्च २०२४ च्या रात्री ११ वाजून ३० मिनिटांपासून ते रात्री १ वाजून ०४ मिनिटांपर्यंत असेल.
होलिका दहनाची गोष्ट
हिरण्यकश्यपू अमरत्वाचे वरदान मिळाल्याने उन्मत्त झाला होता. त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. अत्यंत विष्णुभक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर बसण्यास सांगितले. तिला अग्नीपासून भय नव्हते. प्रत्यक्षात विष्णूचे नामस्मरण करणारा प्रल्हाद चितेवर जळताना सुखरूप राहिला. पण होलिका मात्र जळून भस्मसात झाली. तितक्यात नरसिंह खांबातून प्रगट झाले आणि त्यांनी दुष्ट प्रवृत्ती हिरण्यकश्यपूचे पोट फाडून त्याचा वध केला. वाईट शक्तींना जाळून भस्म करण्यासाठी होलिका दहन करण्याची परंपरा सुरू झाली. या दिवशी महादेवांनी कामदेवांना भस्मसात केले. सगळे भयभीत झाले की कामदेव नसले तर सृष्टी चालणार कशी? तेव्हा महादेवांनी वरदान देवून कामदेवाला जीवनदान दिले. व सर्व देवांनी रंगोत्सव साजरा करून आनंद व्यक्त केला. हा उत्सव पाच दिवस चालला. फाल्गुन कृष्ण पंचमीला म्हणजेच रंग पंचमीला या उत्सवाची सांगता झाली. रंग पंचमी म्हणजे साक्षात कृष्ण आणि राधेचा रंग खेळण्याचा दिवस. या दिवशी सर्व देव रंग खेळतात, असे समजले जाते. चांदीच्या पिचकारीतून केशराचे पाणी शिंपडले जाते.
होळी सणाचे महत्त्व
हिंदू धर्मात होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी सर्व जण आपापसांतील मतभेद विसरून, एकत्र येऊन रंगांचा हा सण साजरा करतात आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या विशेष प्रसंगी सर्व देवी-देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर लाभ मिळतात आणि त्याच्या जीवनात सुख-समृद्धी येते.
हे ही वाचा :
Suresh Dhas on Pankaja Munde: सुरेश धस-पंकजा मुंडे एकमेकांची वरिष्ठांकडे तक्रार करणार