दिवाळी आली की कपडे, फटाके, आकाशकंदील खरेदी करायची लगबग सगळीकडे सुरू होते. एकीकडे घराघरात आई फराळ बनवायला सुरुवात करते आणि लहान मुलांची किल्ला बनवायची तयारी सुरु होते. आम्ही लहान होतो तेव्हा परीक्षा झाली आणि शाळेला दिवाळीची सुट्टी लागली की, त्या दिवसापासूनच आपण किल्ला कसा बनवायचा? यावर्षी नेमकं काय नवीन करता येईल? हे चक्र डोक्यात फिरू लागायचं. आपल्या महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास आहे. त्याला आपल्या पुवर्जांच्या भव्य पराक्रमाचा वारसाही लाभलेला आहे.
आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातील अनेक सुवर्ण क्षण, अनेक मोहिमी, आनंदाचे दुःखाचे क्षण, विजय- पराजय, पराक्रम, आक्रमण यांचे हे गडकिल्ले साक्षीदार आहेत. पण, दिवाळीत किल्ला का बनवतात? हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा याविषयी आपल्यातली ज्येष्ठ मंडळी एक उदाहरण देतात. ते असं सांगतात, “पुर्वीच्या काळात दळणवळणाची साधनं उपलब्ध नव्हती. त्यामुळे गावातील काही ठरावीक लोकच गड किल्ले पाहायला जात होते. मग ते किल्ला बघून आल्यावर दिवाळीच्या काळात लहान मुलांना त्या किल्ल्याचा इतिहास सांगत असत. त्यात किल्ल्याची बांधकाम शैली, त्यावर असणारे बुरुज त्याची माहिती गोष्टीच्या रुपात लहान मुलांना सांगायचे. मग त्यानुसार मुलं किल्ल्याची प्रतिकृती साकारत.
“किल्ल्याची प्रतिकृती तयार केल्यामुळे लहान मुलांना गडकिल्ल्यांचा इतिहास तर कळत होताच. किल्ला हे शौर्याचे आणि ध्येयाचं प्रतिक मानलं जातं .दिवाळीत किल्ला बांधला की सकारात्मकतेच बिज मनामध्ये रुजवण्यांच काम होतं. शिवाय दिवाळीच्या सुट्टीत एक विरंगुळाही यामुळे मिळत असे. पुढे हिच गोष्ट परंपरा बनत गेली आणि प्रत्येक दिवाळीला किल्ला तयार करणे सुरु झाले.”
किल्ला आणि लहान मुलं
किल्ला तयार केल्याने मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते. टाकाऊ वस्तुचा वापर योग्य पद्धतीने करुन मुले किल्ल्यावर सुबकता आणण्यासाठी प्रयत्न करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलं जेव्हा किल्ला तयार करतात तेव्हा त्यांना त्या किल्ल्याची ऐतिहासिक, भौगोलिक आणि बांधकामशास्रांची ओळख प्राप्त होते.अनेक मुलं एकत्र येऊन किल्ला तयार करतात. त्यामुळे त्यांना एकात्मतेचे बळ कळते आणि मुलांच्या मनामध्ये किल्ल्याप्रती आदर देखील निर्माण होतो. किल्ल्यांचं संरक्षण ही आपली जबाबदारी आहे हा विचार त्यांच्या रुजवला जातो. आजही परिस्थिती पाहता गडकिल्लांचे संवर्धन ऐतिहासिक वारसांचे जतन ही काळाची गरज झालेली आहे.त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या भागातील एखाद्या जुन्या किल्ल्यांची प्रतिकृती दिवाळीत किल्ला तयार करतांना साकारा आणि आपल्या जुन्या इतिहासला पुन्हा उजाळा देण्यास काम करा.
हे ही वाचा :
हातात बंदूक धरलेला सिंघम ३ मधील करीना कपूरचा फर्स्ट लूक प्रदर्शित
कुणबी नोंदी शोधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून जोरदार मोहिम सुरु
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.