मी न अबला मी न सबला मी तर आहे प्रबला
नव्या युगाची नवी झेप ही हा तर स्त्री सन्मानाचा सोहळा।।
Women’s Day Special: दरवर्षी ८ मार्च जागतिक महिला दिन (International Womens Day) म्हणून साजरा केला जातो. ज्याचा उद्देश महिलांचे हक्क, समानता आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे आहे. भारत सरकार महिलांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी अनेक योजना राबवत आहे. या योजनांचा उद्देश महिलांना आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मजबूत करणे हा आहे. आज महिला दिनानिमित्त जाणून घेऊया सरकार महिलांसाठी कोण कोणत्या योजना राबवत आहे. ज्यामुळे महिलांना याची माहिती मिळेल.
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना ही २०१५ मध्ये आणली होती. बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना हे भारतातील महिलांच्या प्रगतीसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळं समाजातील मुलींचे हक्क तर मजबूत होतातच, शिवाय त्यांच्या उज्वल भविष्याचा पायाही घातला जातो. स्त्री भ्रूणहत्या थांबवणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि महिलांना स्वावलंबी बनवणे हा त्याचा उद्देश आहे. ही योजना भाजप सरकारने महिलांसाठी राबवली आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही भारत सरकारची एक महत्वाची योजना आहे. ज्याचा उद्देश गरोदर महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे. ही योजना १ जानेवारी २०१७ रोजी सुरू झाली. प्रथमच माता झालेल्या महिलांना ५०००रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम महिलांना तीन हप्त्यांमध्ये दिली जाते: गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांच्या नोंदणीवर रु. १००० चा पहिला हप्ता. प्रसूतीपूर्व तपासणी पूर्ण झाल्यावर रु २००० चा दुसरा हप्ता व मुलाच्या जन्मानंतर पहिली लसीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रु. २००० चा तिसरा हप्ता. असे ५००० रुपये महिलांना या योजनेमार्फत मिळतात. ही रक्कम थेट महिलेच्या बँक खात्यात पाठवली जाते.
उज्ज्वला योजना
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) ही भारत सरकारची एक महत्त्वाची योजना असून या योजनेचा उद्देश हा गरीब कुटुंबातील महिलांना मोफत LPG गॅस कनेक्शन प्रदान करणे हा आहे. ही योजना १ मे २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून सुरू केली होती. ग्रामीण आणि गरीब कुटुंबांना स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. धुरामुळे होणाऱ्या आजारांपासून महिलांचे संरक्षण करणे आणि स्वयंपाक करताना महिलांची सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित करणे हा यामागचा उद्देश आहे.
सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही भारत सरकारने मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने सुरू केलेली दीर्घकालीन बचत योजना आहे. हे २२ जानेवारी २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेअंतर्गत सुरू केले होते, जेणेकरून पालकांना त्यांच्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी बचत करण्यास प्रवृत्त केले जाईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
ही योजना महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी केली आहे. या योजने अंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये देण्यात येतात. महाराष्ट्र सरकारची सर्वात लोकप्रिय व यशस्वी योजना म्हणून ओळखली जाते. मागील व या महिन्याचा हफ्ता आज महिला दिनाच्या निमित्त खात्यात जमा होणार आहे.
हे ही वाचा :
Navneet Rana : औरंगजेबाबद्दल ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्याची कबर लावून घ्या- नवनीत राणा
Follow Us