बीड जिल्हातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणात ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे तर १ आरोपी फरार आहे. गेल्या दीड महिन्यापासून हा प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडच्या मोठ्या प्रमाणात ‘माया’ जमावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाल्मिक कराडची ईडीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती.मात्र आता वाल्मिक कराड विरोधात ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे.
२० हजाराचा दंड
आता वाल्मिक कराडविरोधात ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. याचिकाकर्त्यांना स्वैर याचिका दाखल केल्याबद्दल 20 हजारांचा दंड ठोठावण्याचे हायकोर्टाने स्पष्ट करताच याचिका माघारी घेण्याचे याचिकाकर्त्यांनी मान्य केले आहे. याचिकाकर्त्यांचा हेतू याचिकेतून स्पष्ट होत नसल्यानं याचिका सुनावणीस योग्य नसल्याचे मत नोंदवत मुख्य न्यायमूर्तींनी या याचिकेवर सुनावणीस नकार दिला आहे.
याचिकेत काय?
आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी वाल्मिक कराडची ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल केली होती. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास हायकोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत सुरू करण्याचीही याचिकेत मागणी करण्यात आली होती. एका कॅबिनेट मंत्र्याचं नाव सातत्यानं येत असल्यानं पोलिसांच्या तपासात अनेक मर्यादा येत असल्याचा आरोप देखील याचिकेतून करण्यात आला होता. याप्रकरणी मंत्री महोदयांशी संबंधित अनेक कंपन्या आणि मालमत्तासमोर येत असल्यानं याचिकेत निवडणूक आयोगही प्रतिवादी करण्यात आला होता.
हे ही वाचा :
CIDCO च्या २६००० घरांच्या अर्जदारांची यादी ३ फेब्रुवारीला होणार प्रकाशित; सोडत कधी होणार जाहीर?