महाराष्ट्रातील जळगाव येथील परंडा रेल्वे स्थानकावर भीषण अपघात झाला आहे. पुष्पक एक्स्प्रेसच्या प्रवाशांना कर्नाटक एक्स्प्रेसने चिरडले. वास्तविक, पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि त्यांनी घाईघाईने ट्रेनमधून उडी मारली. त्याचवेळी विरुद्ध दिशेने कर्नाटक एक्स्प्रेस येत होती. त्यामुळे पुष्पक एक्स्प्रेसच्या अनेक प्रवाशांना कर्नाटक एक्स्प्रेसची धडक बसली. या भीषण अपघातात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना पाचोरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीकच्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त करून, मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या कुटुंबिंयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करून, जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जावेत असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागतिक अर्थ परिषदेच्या निमित्ताने दावोस दौऱ्यावर आहेत. तेथून त्यांनी या दूर्घटनेची माहिती घेतली. दुर्घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन पोहचून मदत व बचावासाठी आवश्यक गोष्टींचे व्यवस्थापन करत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दृकश्राव्य संदेश जारी केला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचा उल्लेख करून त्यांनी म्हटले आहे की, काही लोकांचा मृत्यूची ही घटना अतिशय वेदनादायी आहे. जळगांव जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासन समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. घटनास्थळी आठ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असल्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले आहे.
हे ही वाचा :
Davos मध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट, पहिला करार राज्यातील Gadchiroli साठी