बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. याच दरम्यान, सुरेश धस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोलच केला आहे.
सुरेश धस म्हणाले की, “आपल्या मनाप्रमाणे कारभार करण्यासाठी बीडमधून चांगल्या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना आणून भ्रष्टाचार करण्यात आला. गेल्या पाच वर्षात पोलीस दलाचे खच्चीकरण झाले आहे. बीडमध्ये महादेव अॅप मध्ये देखील असाच प्रकार झाला. टेंभुर्णी गावात एकाच व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचा व्यवहार झाला याची ईडीची चौकशी व्हायला हवी होती. तेथे दोन अधिकारी होते त्यांची नावे एसपी यांना सांगितले आहेत. त्या ठिकाणी चांगले काम करणारे अधिकारी बाजूला काढले आणि निष्क्रिय लोकं ठेवली. या प्रकरणाचे धागे मलेशिया पर्यंत गेले आहेत.”
पुढे ते म्हणाले की, “आज लेखी पत्र दिले आहे की बीड जिल्हा पोलीस दलातील पोलिसांची यादी द्या, बिंदूनामावलीप्रमाणे बीड जिल्ह्यातील पोलीसांची संख्या मागवली आहे. बीड जिल्ह्यातील कोणतेही प्रकरण घ्या त्यामागे आकाच असतो. परळी बाजार समितीने गाळे बांधले त्याचे तीन वर्षांपासून उद्घाटन झाले नाही कारण ते गाळे गायरान जमिनीत उभारले आहेत. शिरसाळ्याला चौदाशे एकरच्या आसपास गायरान जमिनीवर आकाचे कार्यकर्ते तीनशे वीटभट्टी चालवत आहेत, एकूण सहाशे वीटभट्टी आहेत त्यातील तीनशे वीटभट्ट्या अनधिकृत जागेवर आहे. त्या ठिकाणी आठ एकरवर देवीचे मंदिर होते पण आता देवीला जाण्यासाठीच रस्ता शिल्लक नाही. ज्या ठिकाणी बंजारा समाजाची जागा होती, त्या समाजाला उठवून तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले आहेत. आका आता नवीन पॅटर्न वापरत आहेत. आनंद चॅरिटेबल ट्रस्टला अडीच एकर जमीन मिळाली आहे. परंतु तेथे काहीही होऊ दिले जात नाही. त्या मागे कोण आहे हे पहा, आणखी खूप आहे, हळूहळू अनेक लोकं पुढे येत आहेत.
आम्ही बघत असतो रश्मिका मांधाना, सपना चौधरी यांचे कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यांना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटीक्स करायचे असेल त्यांनी परळीला यावे. गायरान जमिनीवर पूर्ण ताबा घ्यायचा हा सुद्धा एक परळी पॅटर्न आहे. परळीत राख माफिया देखील मोठ्या प्रमाणात आहेत. थर्मलमधून जी राखेची गाडी निघते त्यावर कोणीतरी टोल वसूल करत आहेत. आम्ही मोर्चात सहभागी होणार आहोत. धनुभाऊ आपले विमान ६० हजारावरून खाली आणा तुम्हाला राजकारण सुचते आहे फक्त पालकमंत्री व्हायचे आहे. आमचा लेकरू मेले त्याला न्याय द्यायचा, तुला कोणी घेरले आहे ? हा काही राजकीय विषय नाही, या मोर्चात वंजारी समाजाचे लोक सहभागी होणार आहेत मुस्लिम लोक सहभागी होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री यांना टरबूज ही उपाधी यांच्या सोशल मीडियाने दिली पण काय झालं आता मला ट्रोल करत आहेत. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणे हेच आमचे मिशन आहे.
हे ही वाचा:
‘संतोष देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे….’जनतेकडून संतापाच्या हाका; आरोपीला शिक्षा देण्याची मागणी
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.