Akshaya Chaitanya NGO: जगभरात व्हॅलेंटाईन डे हा आपल्या प्रिय व्यक्तीला भेटवस्तू, चॉकलेट्स आणि फुलं देऊन साजरा केला जातो, परंतु अक्षय्या चैतन्य स्वयंसेवी संस्थेने मात्र हा दिवस आगळ्या-वेगळ्या पध्दतीने साजरा करत कित्येकांच्या मनात प्रेमाची नवी भावना रुजविली. विविध आजारांनी ग्रासलेल्या आपल्या प्रियजनांची निःस्वार्थपणे काळजी घेणाऱ्या त्यांच्या जवळच्या व्यक्तींना जेवण तसेच गुलाबाचे फुल देत एक वेगळ्या प्रकारे व्हॅलेंटाईन डे साजरा केला. स्वस्थ आहार उपक्रमा अंतर्गत ‘#FeedingWithLove’ या मोहिमेद्वारे केईएम रुग्णालयात रुग्णांची काळजी घेणाऱ्यांना सुमारे १००० व्यक्तींना पौष्टिक आहार आणि गुलाब पुष्प देत त्यांच्याप्रती प्रेमाची भावना व्यक्त करण्यात आली.
अक्षय चैतन्यचे सीईओ विकास परचंदा यांनी सांगितले की, रुग्णालयांमध्ये दिवसरात्र आपल्या प्रियजनांची काळजी घेत त्यांचे कुटुंबिय देखील रुग्णाइतकेच मानसिक तणावातून जात असतात. बहुतेकदा आपल्या प्रिय व्यक्तीची काळजी घेताना ते त्यांच्या स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. त्यापैकी बरेच जण आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करतात किंवा वरचेवर खाण्यावर आपले पोट भरतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो व ते शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या थकतात. परचंदा यांनी सांगितले की #FeedingWithLove या उपक्रमाद्वारे, आम्ही त्यांना केवळ पौष्टिक जेवण पुरवित नाही तर त्यांनी याकाळात स्वतःची देखील तितकीच काळजी घ्यावी याची जाणीव करुन दिली. या कुटुंबियांना पाठिंबा देत, त्यांना या कठीण काळातून मार्ग काढण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुळ उद्देश होता. याचबरोबर स्वस्थ आहार उपक्रमाद्वारे, मुंबईतील ३२ सरकारी रुग्णालयांमध्ये पोषक आहार पुरविला जातो. यामध्ये रुग्णांची काळजी घेणाऱ्या ८,५०० लोकांना दररोज पोषक आहार पुरविण्यात येतो.
केईएम हॉस्पिटलच्या प्रमुख डॉ. संगीता रावत यांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत म्हटले की, केईएम हॉस्पिटलमधील रुग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीला तिची स्वतःची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे हे अक्षय चैतन्य या स्वयंसेवी संस्थेने ओळखले. त्यांच्या या उपक्रमाचे आम्ही मनापासून कौतुक करतो. त्यापैकी बरेच जण हे महाराष्ट्राबाहेरील राज्यांमधून उपचाराकरिता प्रवास करतात आणि अनेकदा त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करताना पहायला मिळतात. त्यांना दररोज पोषक आहार पुरवित, हा उपक्रम केवळ त्यांचे आरोग्य चांगले राखत नाही तर जेवणासाठी येणारा त्यांचा आर्थिक भार कमी करतो. यातून वाचलेले पैसे ते त्यांच्या प्रियजनांच्या औषधांसाठी वापरू शकतात. काळजी घेणाऱ्यांना अनेकदा रुग्णालयात दीर्घकाळ मुक्काम करावा लागतो, ज्यामुळे त्यांना आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतो, काहींना तर आपली नोकरी देखील गमवावी लागते. दररोज गरम, पौष्टिक जेवण उपलब्ध झाल्यास त्यांना देखील चांगली ऊर्जा मिळते. अक्षय चैतन्यची #FeedingWithLove या मोहीमेतून प्रेम हे केवळ शब्दातून व्यक्त होत नाही तर ते आपल्या कृतीतूनही व्यक्त करता येते. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी रुग्णांची काळजी घेणाऱ्यांना पोषक आहार देऊन, या स्वयंसेवी संस्थेने पुन्हा एकदा मुंबईत भूक निर्मूलनाची आपली मोहिम यशस्वीरित्या राबविली आहे.
हे ही वाचा:
Chhaava Movie: ‘छावा’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई !