महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडल्या तर आता आगामी महानगरपालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. यासंदर्भात अलीकडेच मुंबईतील निवडणुकीच्या तयारीसाठी मातोश्रीवर ठाकरे गटाची आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर ठाकरे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाकडून आम्हाला विश्वासात घेतले जात नसल्याचे ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांचे म्हणणे आहे.
ठाकरे गटाच्या नगरसेवकांचे म्हणणे आहे की लोकसभा निवडणुकीपासून आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. आम्हाला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही. मातोश्रीवर होणाऱ्या पदाधिकारी आढावा बैठकीत माजी नगरसेवकांना बोलावलं जात नसल्याने अनेक माजी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठ्याप्रमाणावर पक्षांतर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळाल्याने ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर ठाकरे गटातील माजी नगरसेवक शिंदे गटात करत होते. मात्र, आता शिंदे गटाऐवजी भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची साथ सोडलेल्या नेत्यांना आता पुन्हा परतीचे वेध लागले आहेत. साथ सोडलेले नेते भाजप नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. परतीचे वेध लागलेल्यांना पक्षात घयायचे की नाही याबाबत भाजपमध्ये अद्याप निर्णय नाही. कोकणातील एका नेत्याने नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेले संजय काका पाटील भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. तर निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून गेलेले समरजित घाडगे, हर्षवर्धन पाटील, बाळ माने, राजन तेली यांच्यासारख्या काही महत्वाच्या नेत्यांच्या हालचालींवर आता राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे.