Rajagopala Chidambaram Death : भारतीय अणुशास्त्राचे जनक मानले जाणारे आणि भारताला अण्वस्त्र संपन्न राष्ट्र बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक जगतात शोककळा पसरली आहे.डॉ. चिदंबरम यांनी १९७४ च्या पोखरण-१ आणि १९९८ च्या पोखरण-२ अणूचाचण्यांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अण्वस्त्रांच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त केली.
डॉ. चिदंबरम यांनी भारतीय अणुऊर्जा विभाग आणि भाभा अणु संशोधन केंद्रात महत्त्वाची पदे सांभाळली. त्यानंतर ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार राहिले.त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना १९७५ साली पद्मश्री आणि १९९९ साली पद्मविभूषण या सन्मानाने गौरविण्यात आले. चिदंबरम यांनी राष्ट्रीय पातळीवर अनेक महत्त्वाची पदे भूषवली. २००१ ते २०१८ या काळात ते भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार होते. १९९० ते १९९३ या काळात ते भाभा अणू संशोधन केंद्राचे (BARC) संचालक होते. अणू ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारचे सचिव यासह त्यांनी अनेक प्रमुख पदे भूषविली आहेत. १९९४ ते १९९५ पर्यंत आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा एजन्सीच्या (IAEA) बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. भारताच्या आण्विक क्षमता सिद्ध करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे
१९७४ ला देशाच्या पहिल्या अणू चाचणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे होते. तर १९९८ मध्ये झालेल्या दुसऱ्या अणू चाचणीत त्यांनी अणू ऊर्जा विभागाच्या पथकाचे नेतृत्व केले होते. त्यांच्या या योगदानामुळेच भारत जागतिक पटलावर आण्विक शक्ती म्हणून आपले स्थान निश्चित केले. या क्षेत्रातील त्यांच्या कामामुळे भारतात आधुनिक पदार्थ विज्ञान संशोधनाचा पाया रचला गेला.डॉ. चिदंबरम यांनी ऊर्जा, आरोग्यसेवा आणि सामाजिक आत्मनिर्भरता अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम केले आणि अनेक योजना देखील मार्गी लावल्या. यामुळे भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित गोष्टीत प्रगती झाली आहे. भारतातील सुपर कॉम्प्युटरसाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा विचार करणे आणि नॅशनल नॉलेज नेटवर्कच्या संकल्पनेत महत्त्वाची भूमिका बजावली
पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल भावूक श्रद्धांजली वाहत डॉ. चिदंबरम यांच्या कार्याचा गौरव केला. “भारताच्या वैज्ञानिक आणि सामरिक प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे,” असे मोदी म्हणाले. अणुऊर्जा विभागाच्या निवेदनानुसार, “डॉ. चिदंबरम यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारताच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीला दिशा मिळाली. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे.”
हे ही वाचा:
Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…
Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.