Pankaja Munde On Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख खून प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात मोठा राजकीच आणि सामाजिक तणाव निर्माण झाला आहे. भाजप आमदार सुरेश धस हे पक्षातील आणि महायुतीतील नेत्यांवर गंभीर आरोप करत आहेत. त्यावर राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भूमिका स्पष्ट केली असून पक्षश्रेष्ठींनी सुरेश धस यांना समज देण्याची मागणी केली आहे. शिवाय त्यांनी धस-मुंडे भेटीबद्दलही भाष्य केलं आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पहिली सुनावणी होणार आहे. वाल्मिक कराडसह सर्व आरोपींचा जबाब बंद लिफाफ्यात सादर होणार आहे.बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची एसआयटी चौकशी व्हावी अशी पहिली मागणी मी ११ डिसेंबरलाच पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली होती, असं पंकजा मुंडे यांनी सांगितले. १२ डिसेंबरला मी मस्साजोगला देशमुख कुटुंबीयांची भेट घेण्यास निघाले असता अर्ध्या रस्त्यात असतानाच धनंजय देशमुखांना आमच्या कार्यकर्त्यांनी फोन लावून दिला. ते म्हणाले की, आमच्या भावाला तुम्ही न्याय द्या. आज तुम्ही आलात आणि तुमच्याशी कोणी चुकीचे वर्तन केले, तर आम्हाला आवडणार नाही. त्यामुळे मी मागे फिरले, असा खुलासाही पंकजा मुंडे यांनी या मुलाखतीमध्ये केला आहे.मागच्या तीन वर्षे राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यावेळी धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि सुरेश धस आमदार होते. त्यावेळी देखील वाल्मिक कराड काम करत होता. त्याच्या विषयीची एकही तक्रार सुरेश धस यांनी या तिघांकडे का केली नाही?, असा सवालही पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी भाजपची राष्ट्रीय नेता असूनही धस थेट आरोप कसे करतात?, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस यांना समज द्यावी. सुरेश धस हे सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट गपचूप का घेतली याचे उत्तर सुरेश धस यांनी द्यावे, अशंही पंकजा मुंडे या मुलाखतीमध्ये म्हणाल्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे चार्जशीट कोर्टामध्ये दाखल झाल्यानंतर आज पहिली सुनावणी होत आहे. या सुनावणीला संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हा स्वतः कोर्टामध्ये हजर राहणार आहे.आज कोर्टामध्ये चार्ज फ्रेम केले जाणार असल्याने सगळे आरोपींना कोर्टासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे.
“माझा आणि माझ्या पक्षाचा बीडच्या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनामध्ये शब्द दिलेला असताना सुरेश धस यांनी हे प्रकरण एवढे का पेटवले? मी भाजपची राष्ट्रीय नेता असूनही त्यांनी माझ्यावर थेट आरोप केले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी त्यांना समज द्यावी.” अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा :
Maharashtra Budget 2025: यंदाच्या अर्थसंकल्पाने बळीराजाला काय काय दिले?
Follow Us