अंतरवाली सराटी गावात झालेल्या पोलिसांच्या लाठी मारच्या घटनेनंतर अनेक ठिकाणी आंदोलन होत आहे. दरम्यान जालना जिल्ह्यातील अनेक भागात असेच आंदोलन पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी रस्ता रोको करण्यात येत आहे, तर काही ठिकाणी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. तर अनेक गावांनी अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा वाढत आहे. तर, मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याच्या मागणीमुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे. दरम्यान यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. मात्र, आरक्षणाचा जीआर आल्याशिवाय आपण उपोषणावर कायम असणार असल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांच्यासह उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी आज म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, आरोग्यमंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि उदयनराजे भोसले यांचे शिष्टमंडळ जाणार आहे.
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करण्यात येत आहे. आज या उपोषणाचा आठवा दिवस आहे. दरम्यान, उपोषणस्थळी दोन दिवसांपूर्वी पोलिसांकडून अमानुषपणे लाठी हल्ला करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटल्याने सरकार अडचणीत सापडले आहे. तर, मनोज जरांगे यांनी आजपासून पाणी देखील पिणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यातच राज्यभरात या उपोषणाला मोठा पाठींबा मिळत आहे. तसेच ठिकठिकाणी आंदोलन आणि बंद पाळण्यात येत आहे. त्यामुळे होईल तेवढ्या लवकर यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावात जाणार आहे. त्यामुळे यावर आज काही तोडगा निघणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
जालना येथील घटनेच्या निषेधार्थ आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावा या मागणीसाठी राज्यभरात सकल मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून आंदोलन केले जात आहे. अनेक जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. तर आज देखील कोल्हापूर आणि बीड जिल्ह्यात बंदची हाक दिली गेली आहे. ठिकठिकाणी होणारे रस्ता रोको आणि एसटी बसची तोडफोड लक्षात घेता मराठवाड्यात येणाऱ्या बसेस बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात तापला असल्याचे चित्र आहे. यापूर्वी देखील एकदा गिरीश महाजन यांना पाठवून सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली होती. मात्र त्यात यश मिळाले नव्हते. त्यामुळे आज दुसऱ्यांदा सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावात जात आहे.
हे ही वाचा:
Maharashtra Weather News, विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट…
जालन्यात झालेल्या लाठीचार्जवर आमदार बच्चू कडूंनी दिली प्रतिक्रिया…