छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या गुन्हेगारी वाढत चालली आहे. या वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष वेधले जात असतानाच दुसरीकडे वाळूमाफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांनाच पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी वाळूमाफियांवर कारवाई करण्या ऐवजी १०० – १५० वाळूमाफियांना पोलीस स्टेशनमध्ये आणले आणि पोलिसांनी तहसीलदारांची तक्रार लिहून न घेता त्यांना ३ तास बसवून ठेवले. एवढच नाही तर त्यांची गाडी देखील जप्त केली. महाराष्ट्रात तहसीलदारांची गाडी जप्त करण्याचा पहिलाच प्रकार घडला असेल. या प्रकरणी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पोलीस आयुक्तांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची मनमानी समोर आली आहे. आणि वाळूमाफियांना अभय देण्यासाठी पोलिसांची मजल, तहसीलदाराला शिवीगाळ करत वाहन जप्त करण्यापर्यंत गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांचेच गुन्हेगारीला पाठबळ असल्याचं बोललं जात आहे.
नेमकं काय घडलं..
छत्रपती संभाजीनगरचे तहसिलदार रमेश मुंडलोड, दि. 6 फेब्रुवारी रोजी रात्री 10. वा. शासकीय काम आणि काही राजशिष्टाचाराची कामे आवरून घराकडे जात होते. यावेळी गारखेडा परिसरातील विजय चौक या ठिकाणी एक रेतीने (वाळू) भरलेला हायवा आढळून आला. वाळू वाहतुकीबाबत वाहनचालकास रॉयल्टीबाबत विचारणा केली असता वाहनचालकाने रॉयल्टी नसल्याचे सांगितले. या गाडीच्या मालकाविषयी त्यांनी विचारणा केली असता त्यांनी पवार नावाच्या पोलिस कर्मचाऱ्यांची गाडी आहे असे सांगितले. हे कळताच संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना बोलावून घेतलं आणि तलाठी यांना गाडीमध्ये बसून ते वाहन जप्त करण्यास तहसील कार्यालयाचे आवारात घेऊन जात होते. त्यादरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या शेजारी रेती माफिया, पोलीस कर्मचारी पवार, तसेच इतर सगळ्यांनी मिळून तहसिलदारांची गाडी थांबवली. तहसिलदार ऑफिसची गाडी ही थांबून अरेरावीच्या भाषेत बोलत होते. पोलीस कर्मचारी पवार त्याने तहसीलदारांना शिवीगाळ केला. याबाबत संपूर्ण व्हिडीओ रेकॉर्डिंग तहसीलदारांनी रेकॉर्ड केली आहे.
काय म्हणाले तहसिलदार रमेश मुंडलोड…
पवार यांनी अंदाजे 100ते 150 वाळूमाफियांना जमा करुन मला धमकावण्याचा प्रयत्न करुन माझ्याशी वाद घालत वाळूने भरलेला हायवा पळवून लावल्याचं तहसिलदार रमेश मुंडलोड यांनी सांगितले. हायवा पळवून लावल्यानंतर पवार नावाच्या पोलिस कर्मचाऱ्यानं सांगितले की, मी पोलिस कर्मचारी असून मी सर्व पोलिस स्टेशनला काम केलेले आहे, माझ्याविरोधात कुठल्याही पोलिस स्टेशनला कारवाई होणार नाही व मला कोणी काही करु शकत नाही असे सांगितले. त्यामुळे पवार यांच्याविरुद्ध घटनेची तक्रार करण्यासाठी मी स्वतः व पथकातील कर्मचारी जिन्सी पोलिस स्टेशन येथे रात्री १०.३० ते ११ वाजेच्या दरम्यान गेलो असता तेथे माझ्या अगोदरच पवार पोलिस कर्मचारी व त्याचा मुलगा व त्यांच्यासोबतचे 100ते 150वाळूमाफिया माझ्या अगोदर पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित होते. असे तहसिलदारांनी सांगितले.
तहसिलदारांची गाडी जप्त
मी पोलिसस्टेशन जिन्सी येथे उपस्थित पोलिस उपनिरीक्षक यांना झालेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली, परंतु वाळू वाहतूक करणारे पवार हे पोलिस कर्मचारी असल्याने पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित अधिकारी यांनी माझी तक्रारीची नोंद करुन न घेता वाळूमाफिया पोलिस कर्मचारी यांचीच असल्याने त्यांना साथदेत उलट माझ्याच वाहनाची चावी काढून घेऊन मला पोलिस स्टेशन येथे बसवून ठेवले. रात्रीचे 1 वाजेपर्यंत पोलिस स्टेशन जिन्सी येथे माझी कुठलीही तक्रार पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी नोंदवून न घेतल्याने मी रात्री 1 वाजता लेखी स्वरूपात तक्रार देऊन मला कार्यालयाची गाडी परत देण्यासाठी विनंती केली असता पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितले. ‘तुमची गाडी अवैधरीत्या फिरत होती म्हणून आम्ही जप्त केली आहे. अशा प्रकारे उत्तर देऊन मला कार्यालयाची गाडी देण्यात आलेली नाही. मी पथकातील कर्मचारी यांच्या खाजगी वाहनाने पोलिस स्टेशन येथून जमा झालेल्या 100 ते 150 वाळुमाफीयांच्या गराड्यातून सुटका करून घेऊन घरी गेलो. असे तहसिलदारांनी सांगितले.
हे ही वाचा :
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा