जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने (Somnath Suryawanshi Mother) जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे (Raghunath Gawade) यांच्यासमोर आक्रोश व्यक्त केलाय. तुम्ही मला न्याय दिला नाही तर मी इथेच आत्महत्या करून माझा जीव देणार असल्याचा इशारा सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) यांच्या आई विजयाबाई यांनी दिलाय. माझा जीव गेला तरी बेहतर पण मी न्याय घेणारच, असा पवित्रा विजयाबाई यांनी घेतलाय.
परभणीत झालेल्या संविधानाच्या विटंबनेनंतर पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण मिळाले आणि या घटनेनंतर पोलिसांनी धरपकडं करून अनेकांना अटक केली होती. आंदोलकांना अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) यांचा मृत्यू झाला होता. आज दीड महिना उलटला तरीही सोमनाथच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही. यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने आक्रमक पवित्र हाती घेतला आहे. परभणीतील दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी, आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी आज परभणीत वंचित बहुजन आघाडीकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. परभणी शहरातील शनिवार बाजार येथील मैदानापासून हा मोर्चा प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आला. यावेळी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे तसेच जिल्ह्याचे पदाधिकारी,महिला,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबिय ही या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. हातात संविधानाचे फलक घेवून मोर्चेकरांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, सरकार जाणून-बुजून या तीनही कुटुंबीयांना न्याय देत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वेळ आली तर आम्ही न्यायालयीन लढा लढू पण आम्ही या प्रकरणांमध्ये न्याय मिळवून देऊ, अशी भूमिका वंचितच्या नेत्यांनी घेतली आहे.
दरम्यान, सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या आई विजया यांची तब्येत खालावली होती. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले होते. सोमनाथ यांच्या आईला अशक्तपणा जाणवत होता, त्यामुळे त्यांची तब्येत खालावली होती. मात्र, काही दिवसांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली पाहायला मिळाली. दरम्यान, आता लेकाला न्याय मिळवण्यासाठी विजया यांनी पुन्हा पुढे येत आत्महत्येचा इशारा दिलाय.
हे ही वाचा :
अमेरिकेतील विमान अपघातात १९ जणांचा मृत्यू, ६४ जण अजूनही विमानातच, बचावकार्य सुरूच…