जळगाव येथील प्रसिद्ध दागिने व्यापारी राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि. यांचा खात्यावरील फसवणुकीचा ठपका स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) हटवला आहे. याबाबत बँकेने कंपनीला अधिकृत पत्र पाठवून माहिती दिली आहे. बँकेने फ्रॉड हा ठपका हटवला असल्याची माहिती माजी खा. ईश्वरलाल जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला ईश्वरलाल जैन, मनीष जैन यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा दिवाळीचा दिवस आहे. आम्हीच जिंकणार असल्याचा आम्हाला विश्वास होता. आम्ही खरे असून सत्याचा विजय होण्यास उशीर लागतो मात्र विजय नक्की होतो हे आम्हाला माहिती आहे. बँकेने स्वतः पत्र पाठवून हे कळवले असल्याचे माजी आ.मनीष जैन यांनी सांगितले.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फसवणूक ओळख समितीने दि.१३ मे २०२० रोजी झालेल्या बैठकीत आर.एल.ग्रुप कंपनीचे खाते फसवणूक श्रेणीत वर्गीकृत केले होते. यानंतर बँकेने हा अहवाल रिझर्व्ह बँकेला (RBI) सादर केला आणि संबंधित खाते सेंट्रल फ्रॉड रजिस्टरमध्ये नोंदवले गेले. मात्र, कंपनीने या निर्णयाला कायदेशीर आव्हान दिले होते.
बँकेने पत्रात स्पष्ट केले आहे की, फसवणूक म्हणून श्रेणीकरण करताना योग्य संधी न दिल्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यानुसार, १८ फेब्रुवारी २०२५ रोजी कंपनीच्या खात्यावरील फसवणुकीचा ठपका हटवण्यात आला असून, सेंट्रल फ्रॉड रजिस्टरमधून नोंदही काढून टाकण्यात आली आहे.
तथापि, बँकेने असेही स्पष्ट केले आहे की, हा निर्णय अंतिम नाही. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून बँक भविष्यात पुन्हा तपास सुरू करू शकते. या निर्णयामुळे राजमल लखिचंद ज्वेलर्स प्रा. लि. ला मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या व्यवसायिक प्रतिमेवर सकारात्मक परिणाम होणार आहे.
दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या ठपक्यामुळे आमच्याकडे सीबीआयने कारवाई केली, त्यानंतर ईडीने कारवाई केली. स्टेट बँकेने हा ठपका हटवल्याने पुढील सर्व कारवाई देखील भविष्यात हटवल्या जातील, असा विश्वास ईश्वरलाल जैन यांनी व्यक्त केला आहे. तसेच आमच्यावर केलेल्या या कारवाईबाबत स्टेट बँकेने दिलगीरी व्यक्त करावी, यासाठी पत्र देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
हे ही वाचा :
Uddhav Thackeray आणि Eknath Shinde आमने सामने येताच; कहीं पे निगाहें कहीं पे निशाना…
Maharashtra Budget 2025: यंदाच्या अर्थसंकल्पाने बळीराजाला काय काय दिले?
Follow Us