spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ; उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची ग्वाही

गेल्या अडीच वर्षात विक्रमी कामं झाली. एकही दिवस सुट्टी न घेता आम्ही काम केलं. त्यामुळे या राज्याच्या निवडणूक निकालांत इतिहास घडला.

महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचं राज्य करतानाच विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. गेली अडीच वर्षे महाराष्ट्राच्या कायापालटाला सुरूवात झाली असून आता आमचं एकत्रित मिशन आहे समृध्द महाराष्ट्राचं. आता आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ. महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ते म्हणाले, गेल्या अडीच वर्षात महायुतीने विकास आणि कल्याणकारी योजनांचं ऐतिहासिक काम केलं. गेल्या अडीच वर्षात विक्रमी कामं झाली. एकही दिवस सुट्टी न घेता आम्ही काम केलं. त्यामुळे या राज्याच्या निवडणूक निकालांत इतिहास घडला.

अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचं वचन

गेली अडीच वर्ष आम्ही एक टीम म्हणून काम केलं. त्यामुळेच आमचं सरकार हे जनतेचं लाडकं सरकार झालं. जनतेच्या विश्वासामुळं आमची जबाबदारी वाढली आहे. आता अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचं वचन आम्ही देतोय. मुख्यमंत्री म्हणून काम करताना माझं धोरण गतिमान विकास हेच होतं तिथं पक्षभेद, द्वेषाला कधी थारा दिला नाही. माझ्यावर टीका झाली पण मी त्याला कामातूनच उत्तर दिलं.

विकास कामांचा स्ट्राईक रेट वाढतच राहणार

गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारच्या विकास कामांचा स्ट्राईक रेट देशात सर्वाधिक होता. यापुढे हा स्ट्राईक रेट वाढतच राहणार आहे. महाराष्ट्राला देशात क्रमांक एकचे राज्य बनविण्यासाठी आम्ही सगळे दिवस-रात्र चोवीस तास काम करत होतोच यापुढेही करू अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

विदर्भ विकासासाठी ठोस पावले

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विदर्भाशी माझं वेगळं नातं आहे ते इथल्या प्रेम करणाऱ्या जनतेमुळे. मुख्यमंत्री असतांना मलाही विदर्भासाठी काहीतरी भरीव करण्याची संधी मिळाली याचा निश्चितच आनंद आहे. गेल्या दोन्हीही अधिवेशनात आम्ही विदर्भाच्या विकासासाठी ठोस पाऊलं उचलली आहेत आणि त्याचे चांगले परिणाम दिसू लागलेत. समृध्दी महामार्ग आपण गोंदिया, भंडारा, गडचिरोलीपर्यंत पुढे नेत आहोत. विदर्भातल्या ५ लाख शेतकऱ्यांना धान्य उत्पादनासाठी हेक्टरी १५ हजार रुपये बोनसची घोषणा मुख्यमंत्री म्हणून पहिल्याच अधिवेशनात मी केली होती. या बोनसची रक्कम आम्ही २० हजार केली आहे. विदर्भ लॉजिस्टिक हब म्हणून विकसीत करायचा आहे. विदर्भ, मराठवाडामधील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ७० हजार कोटीच्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे. सुरजागड येथे दोन नवीन प्रकल्प माझ्या कार्यकाळात सुरू झाले. गेल्या अडीच वर्षात आम्ही ८६ कॅबिनेट बैठका घेतल्या आणि ८५० महत्त्वाचे निर्णय घेतले. छोटे मोठे निर्णय सांगायला बसले तर एक अधिवेशन कमी पडेल, असेही ते म्हणाले.

अग्रेसर महाराष्ट्र…

गेल्या अडीच वर्षात ज्या लोककल्याणकारी योजना राबवल्या गेल्या. विक्रमी विकासकामं झाली. परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिला आहे, महिला सक्षमीकरणात महाराष्ट्र पहिला आहे, जीएसटीत पहिले आहोत, उद्योगांमध्ये पहिला क्रमांक, पाच लाखांचा आरोग्य विमा देणारं पहिलं राज्य, शेतकऱ्यांना मोफत वीज देणारं पहिलं राज्य, १० लाख तरुणांना स्टायपेंड देणारं पहिलं राज्य, देशातला सर्वाधिक लांबीचा सागरीसेतू करणारं पहिलं राज्य आणि सर्वात मोठं मेट्रो नेटवर्क असलेलं राज्य, अशी महाराष्ट्राची देशभरात ओळख झाल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात १० लाख कोटींची पायाभूत सुविधांची काम

महाराष्ट्रात १० लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामं सुरु आहेत. महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. मुंबई, एमएमआर, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरांत साडेचारशे किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्ग सुरु करणार आहोत. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला आम्ही मंजुरी दिली आहे. पुणे रिंग रोड, अलिबाग-विरार मल्टीमोडल कॉरिडोर ही कामे वेगाने सुरु आहेत. सात हजार किमी अॅक्सेस कंट्रोल रस्ते आपण तयार करतोय. राज्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी सात ते आठ तासांपेक्षा जास्त वेळ लागता कामा नये असं आमचे नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

राज्यात आलं निळे वादळ, तर संसदेत दिसला ड्रेस वॉर; राहुल गांधी ब्लू टीशर्टमध्ये तर प्रियंका गांधींनी नेसली निळी साडी…

अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या कथित विधानानंतर संसद दणाणली; विरोधक आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss