कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूरच्या प्रवाश्यांसाठी महत्वाची बातमी आहे. शिळफाटा रस्त्यावरील पलावा जंक्शन जवळील निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतूक बंद असणार आहे. ५ फेब्रुवारी रात्री १२ ते १० फेब्रुवारी रात्री १२ पर्यंत वाहतूक बंद असणार आहे. ५ ते १० फेब्रुवारी या पाच दिवसांच्या कालावधीत पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती कोळसेवाडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.
शिळफाटा ते कल्याण रस्ता बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबईहून डोंबिवलीला जाणाऱ्या आणि शिळफाटा मार्गे मुंबईला जाणाऱ्या वाहनांचा मार्ग बदलण्यात आला आहे. पलावा जंक्शनकडे येणारी हलकी, मध्यम वाहनांची वाहतूक पर्यायी रस्ते मार्गाने वळवण्यात येणार आहे. अवजड वाहनांना हा रस्ता बंद असणार आहे.
पर्यायी वाहतूक मार्ग कोणते?
डोंबिवली, कल्याण भागातील वाहन चालकांना मोठागाव माणकोली उड्डाण पुलावरून इच्छित स्थळी प्रवास करावा लागणार आहे. शिळफाटा मार्गे नवी मुंबई, पनवेलकडे जाणाऱ्या वाहन चालकांना काटई नाका येथे डावे वळण घेऊन बदलापूर पाईपलाईन मार्गे तळोजा रस्त्याने इच्छित स्थळी जावे लागणार आहे.
बदलापूर, अंबरनाथ, कर्जतकडून येणाऱ्या वाहन चालकांनी काटई नाका येथे न येता खोणी गाव येथे वळण घेऊन तळोजा काँक्रीट रस्त्याने पनवेल, नवी मुंबईकडे जावे. हलक्या, मध्यम वाहनांनी काटई गाव, काटई गाव कमान येथून लोढा, पलावा दिशेने विरुद्ध मार्गिकेतून जावे. तेथून पलावा जंक्शन येथे नियमित मार्गिकेत येऊन इच्छित स्थळी जावे, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे.दिलेल्या मार्गांशिवाय इतर मार्गांचा वापर वाहनांनी करू नये, त्यासोबत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन ठाणे शहर वाहतूक नियंत्रण विभागातर्फे करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
Union budget मध्ये अनु क्षेत्रासाठी २० हजार कोटीची तरतूद