Kalyan Murder Case: गेल्या काही महिन्यांपासून कल्याणमध्ये एकापाठोपाठ एक घटना घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानतंर कल्याणच्या एका सोसायटीमध्ये मराठी-अमराठी कुटुंबाचा वाद होऊन हाणामारीची घटना घडली. हे प्रकरण ताजं असतानाचं गेल्या महिन्यात कल्याण रेल्वे स्टेशनवर रिक्षावाल्यांनी दादागिरी करत प्रवाशाशी गैरवर्तन केलं.तर आता कल्याणमध्ये भर रस्त्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला. ज्यामध्ये एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
कल्याण पूर्व येथील काटेमानिवली परिसरातील नाना पावशे चौकात मध्यरात्री गोळीबार झाला. यामध्ये रणजीत दुबे नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा इसम एका मोठ्या गँगसाठी काम करत असल्याचे समोर आले आहे. तो कल्याणच्या काटेमानिवली येथील पावशे चौकात रहात होता. काल मध्यरात्री तेथे गोळीबार झाला. मृत रणजीत याची उत्तर प्रदेशमध्ये एक जागा होती. आणि त्याच जागेच्या मुद्यावरून रणजीतचा चुलत भावाशी, राम दुबेशी काही दिवसांपासून वाद सुरू होता. तोच राग काढत काल मध्यरात्रीच्या सुमारास चौकात गोळीबार करण्यात आला आणि जीव वाचवण्यासाठी रणजीत दुबे समोरच्या इमारतीत घुसला.
उत्तर प्रदेशातील जागेच्या वादावरून चुलत भावाकडूनच रणजीत दुबेची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. डोक्यावरशस्त्राने वार करण्यात आले आहेत. याप्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास केला आणि आरोपी राम दुबे याला बेड्या ठोकून अटक केल्याचे समजते. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे. मात्र गोळीबार आणि निर्घृण हत्येच्या या घटनेमुळे कोळसेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत.
Follow Us