शासकीय योजनांच्या वैद्यकीय मदतीच्या निकषात आजार बसत नसल्याने आर्थिक विवंचनेतील पाच रुग्णांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशामुळे पाच लाखांची मदत मिळवून देण्यात आली. वेळीच मदत मिळाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहे.
या रुग्णांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात मदतीसाठी विनंती केली होती. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायकता कक्षास कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानुसार कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी तत्परतेने कार्यवाही केली. त्यामुळे आरव चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या रुग्णांना मदत उपलब्ध करून देण्यात आली.
मुख्यमंत्र्यांची मोलाची मदत, धीर देणारा आधार
‘आमच्या बिकट परिस्थितीमुळे किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया व उपचार थांबण्याची भीती निर्माण झालेली असताना वेळीच मिळालेली ही मदत मोलाची आणि तेवढीच धीर देणारी आहे,’ अशा शब्दांत एका २८ वर्षीय रुग्णाच्या पतीने मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.
ठाण्यातील १२ वर्षीय चिमुकला रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत असून त्याच्या उपचारासाठीही मदत मिळाली. ‘मित्रपरिवार-नातेवाईकांकडे मदत मागून थकलो पण उपयोग झाला नाही, मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या तत्परतेमुळे मदत मिळाली आणि पुढील उपचारासाठी धीरही मिळाला,’ अशी भावना या चिमुकल्याच्या वडिलांनी व्यक्त केल्या. त्याला पुढील उपचाराकरिता शासनस्तरावर त्याला सर्व मदत केली जाणार आहे.
याबरोबर ठाणे जिल्ह्यातील रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला पायावरील शस्त्रक्रियेकरिता, कोल्हापूर येथील रुग्णाला किडनी प्रत्यारोपणासाठी तसेच छत्रपती संभाजीनगरमधील एका चिमुकल्याला वैद्यकीय उपचाराकरिता मदत करण्यात आली असून या रुग्णांच्या नातेवाइकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे तसेच आरव संस्थेचे आभार मानले आहे. या मदतीमुळे या पाचही रुग्णांच्या कुटुंबाना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, गरजू रुग्णांना मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून समाजातील दानशूर व्यक्ती, उद्योजक आणि खाजगी संस्थांनी जास्तीत जास्त संख्येने समोर यावे, असे आवाहन कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
हे ही वाचा:
राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचे प्रयागराज येथे कुंभस्नान