मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज किल्ले पन्हाळगड, कोल्हापूर येथे, ६ मार्च १६७३ रोजी कोंडाजी फर्जंद यांनी आदिलशहाकडून पन्हाळगड जिंकून घेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात सामील केल्याच्या विजयोत्सवाचे औचित्य साधून ’13 D थिएटर’चे लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पन्हाळगडचा रणसंग्राम’ हा लघुपट पाहिला व उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, परकीय आक्रमकांमुळे काळरात्र आलेली असताना राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवले. त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करत स्वराज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण आहोत, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्यापैकी कोणीच इथे दिसले नसते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहेत. छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी आणि त्यानंतरच्या जाज्ज्वल्य इतिहासात मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले, हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेज होते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिवा काशिद व बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाचा इतिहासदेखील विस्ताराने सांगितला. तसेच 13D थिएटरमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा इतिहास जगता येणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासाठी आ. विनय कोरे यांचे आभार मानले.
किल्ले पन्हाळगड शिवकालीन पुनर्निर्मित पहिला किल्ला असेल असे सांगत यासाठी राज्य शासनाच्या वतीने निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, जोतिबाचा डोंगर विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असून त्याला मान्यता दिली आहे, त्यासाठीचे प्राधिकरण येत्या १५ दिवसांत स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आश्वस्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे १२ किल्ले जागतिक वारसास्थळ म्हणून नॉमिनेट केले असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा जागतिक वारसा होण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खा. धनंजय महाडिक, खा. धैर्यशील माने, आ. गोपीचंद पडळकर, आ. डॉ. विनय कोरे, आ. अमल महाडिक, आ. राहुल आवाडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
हे ही वाचा:
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची निराशा; २१०० रुपयांसाठी अजून वाट पाहवी लागणार