हवामान खात्याने मोठा अंदाज वर्तविला आहे. राज्यात मुंबई, पुणे, नाशिकसह उर्वरित महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढली आहे. वाऱ्याची चक्राकार दिशा आणि अरबी समुद्रात आर्द्रता यामुळे बहुतांश ठिकाणी किमान तापमानत घट झाली आहे. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जिल्ह्यात किमान तापमानात घट होताना दिसत आहे. तसेच येत्या काही दिवसांत राज्यातील तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईत काल रात्रीपासून थंडीची तीव्रता वाढली असून सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. मुंबईत काल रात्री तापमानाचा पारा १९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याचे पाहायला मिळत आहे.दादर, परळ, लालबाग यांसारख्या ठिकाणी १८-१९ अंश इतके तापमान नोंदवण्यात आले आहे. तर मुंबई उपनगरात अंधेरी, घाटकोपर या भागात तापमानाचा पारा १६-१७ अंशापर्यंत घसरला होता. तर मालाड, कांदिवली, गोरेगाव, बोरिवली, मुलूंड, ठाणे या भागात १५-१६ अंश कमी तापमानाची नोंद करण्यात आली. मुंबईतील थंडीची तीव्रता पुढील दोन दिवस कायम राहणार असून सध्या मुंबईत सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा परतला आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आला आहे. राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याचा अंदाज असल्याने थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्र आणि परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती शांत झाली आहे. तर आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पश्चिमी चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये हलक्या पावसासह हिमालय लगतच्या भागात हिमवृष्टी सुरूच आहे.राज्यात जळगाव, जालना जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
हे ही वाचा:
MNS बद्दल विचारताच आदित्य ठाकरेंनी साधला राज ठाकरेंवर निशाणा !, म्हणाले,…