राज्यातील काही भागात कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा जास्त फटका टोमॅटो पिकाला झाला आहे. राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण आता टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटोला खूप कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. काही ठिकाणी शेतकरी रस्त्यावर टोमॅटो ओतून निषेध करत आहेत. टोमॅटो दराच्या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप (Sandeep Jagtap) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांची माती होण्यामागे केंद्र सरकारची नीती कारणीभूत असल्याची टीका जगताप यांनी केंद्र सरकारवर केलीय.
मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जेव्हा टोमॅटोचे मार्केट चांगले होते, तेव्हा केंद्र सरकारनं नेपाळहून टोमॅटोची आयात केली, परिणामी राज्यातील टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्याचे संदीप जगताप म्हणाले. आज शेतकऱ्यांना एक, दोन रुपये किलोनं देखील पैसे हातात पडत नाहीत, अशा वेळेस केंद्र सरकार झोपा काढत आहे का? असा सवाल जगताप यांनी केला आहे. टोमॅटोच्या पिकासाठी लाखो रुपये खर्च येतो. पण सध्या मिळत असलेल्या भावामुळे मजुरीसुद्धा सुटणे अवघड झाले आहे. कमी दरामुळे लाखो रुपयांचे भांडवल खर्च झालेल्या टोमॅटो शेतकऱ्यांचा खर्चही निघणं कठीण झालं आहे. राज्यभरात पावसाने दांडी मारल्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत पडला आहे. या कमी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना बसला आहे.
आज राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत पडला आहे. मागच्या महिन्यात टोमॅटोला चांगला भाव मिळाला होता. पण मागील काही आठवड्यापासून टोमॅटोच्या दरात घट झाली आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारनं नाफेडमार्फत ५०रुपये किलो दरानं टोमॅटोची खरेदी करावी अशी मागणी जगताप यांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. टोमॅटोचे दर पडल्यानंतर जगताप म्हणाले ‘ याला सरकारचे आयात निर्यातीचे धोरण अवलंबून आहे. कारण आपल्या देशाच्या आजूबाजूच्या देशाचे व्यापारी आपल्या देशाकडून शेतमाल खरेदी करत नाहीत. कारण सरकार कधीही आयात सुरु करते, कधीही निर्यात सुरु करते, ही धोरण शेतमालाचे दर पडण्यास कारणीभूत असल्याचे ‘ जगताप म्हणाले.
हे ही वाचा:
सांगलीतील मराठा समाज आक्रमक, मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग