विद्युत प्रवाह अचानक सुरु होऊन किंवा योग्य माहिती नसल्याने प्रवाह सुरु असलेलय वायरला हात लागल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशाच एका घटनेमुळे २ भावांचा हकनाक बळी गेला आहे. नाशिक (Nashik) येथील त्र्यंबकेश्वरजवळच्या तळेगाव काचुर्ली भागातील विजेचा झटका लागून २ जणांचा मृत्यू झाला आहे. ३० वर्षीय तुकाराम पारधी आणि २२ वर्षीय ज्ञानेश्वर पारधी यांचा विजेचा धक्का (Electric Current) लागल्याने जागीच मृत्यू झाला. टोमॅटोच्या पिकाला (Tomato Crop) पाणी भरण्यासाठी वीजपंप जलपरी पाण्यात सरकवताना ही घटना घडली.
त्र्यंबकेश्वरजवळच्या तळेगाव काचुर्ली येथील किकवी नदीपात्रात सायंकाळी पाचच्या सुमारास नदीपात्रातील पाणी कमी झाले म्हणून मोठा भाऊ तुकाराम जलपरी पुढे ढकलण्यास गेला. मात्र, जलपरीत विजेचा प्रवाह उतरलेला असल्याने त्याला जोरदार धक्का बसला.
दरम्यान, काठावर उभा असलेला लहान भाऊ ज्ञानेश्वरने हा प्रकार पाहून त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, तो देखील वीजप्रवाहात सापडला. जोरदार धक्का बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. तुकाराम हा विवाहित असून, त्याला लहान मुले आहेत, तर ज्ञानेश्वर हा अविवाहित होता. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
हे ही वाचा :
संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
श्रद्धा कपूरने खरेदी केली नवी लॅम्बोर्गिनी कार