एकीकडे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, नागरिकांकडून सर्रास वाहतुकीचे नियम मोडले जातात. वारंवार जनजागृती करूनही नियमांची पायमल्ली केली जाते. त्यात ई-चलनाद्वारे दंड येत असल्याने आता पोलिसांची पूर्वी असलेली भीतीदेखील लुप्त होत चालली आहे. गतवर्षी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे अशा १ लाख ९८ हजार ५८९ वाहनचालकांना कैद करून १९ कोटी ४२ लाख ८६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.
गेल्या दहा वर्षांमध्ये शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली. क्रमाने अरुंद रस्ते, अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याचे प्रमाणही वाढले. महापालिका, पोलिस प्रशासन सुरळीत वाहतुकीसाठी सातत्याने अपयशी ठरत असताना, वाहनचालकांचा बेशिस्तपणाही वारंवार उघडकीस येतो. नियम मोडणाऱ्यास ई-चलनाद्वारे थेट छायाचित्रांसह दंडाची पावती जाते.
दंड ठोठावलेल्या १ लाख ८७ हजार ५०८ वाहनचालकांकडे अद्यापही १८ कोटी ३६ लाख ६२ हजार २५० रुपयांचा दंड भरणे बाकी आहे. उलट दिशेने जाणे, सुसाट वाहने पळवणे, हातात मोबाइल धरून वाहन चालवणे, ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट व अनेक प्रकारे वाहतुकीचे सर्रास नियम मोडले जातात. परंतु वाहतूक दंड प्रलंबित ठेवणाऱ्यांना रितसर नोटीस पाठवली जात आहे, तरीही त्याकडे दुर्लक्ष होत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. लवकरच दंड वसुलीसाठी मोहीम राबवून कारवाई केली जाईल. दंड न भरणाऱ्या वाहनावर जप्तीची कारवाई सुद्धा होईल. अशी माहिती वाहतूक पोलिस धनंजय पाटील यांनी दिली.
हे ही वाचा :