मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तेरावा दिवस आहे. दरम्यान आजपासून जरांगे यांनी उपचार आणि पाणी घेण्यास नकार दिला असून, आमरण उपोषण सुरु केले आहे. तसेच, सरकार वेळोवेळी वेळ मागून घेत आहे. त्यामुळे महिना नाही आणखी दोन महिन्या घ्या, पण आरक्षण द्या असे जरांगे म्हणाले आहेत. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्यावरुन आता मनोज जरांगे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून जरंगे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी ठाम मांडून अजून देखील ते त्यांच्या मतावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान मनोज जरांगे यांनी सांगितले की, “आता पुढील दिशा म्हणजेच आमरण उपोषण सुरु केले आहे. सरकारला कालपर्यंत दिलेला वेळ आता संपला आहे. याचा अर्थ असा नाही की, सरकारने प्रयत्न केले नाही. त्यांनी प्रयत्न केले, पण त्यांनी काढलेल्या जीआरमध्ये चुका झाल्या. त्यामुळे यात मुख्यंमत्री एकनाथ शिंदे नक्कीच बदल करतील. मात्र, त्यांना मी शब्द दिला होता की, चार दिवस पाणी आणि उपचार घेईन. मी माझ्या शब्दावर पक्का असून, आता चार दिवस झाले आहेत. त्यामुळे आजपासून पाणी आणि उपचार घेण्याचं बंद केले आहे. सरकार एक महिन्याचा वेळ मागत आहे, त्यामुळे वेळ देण्यासाठी आमची काहीही हरकत नाही. आमचं उपोषण सुरुच आहे. तुम्ही एक महिन्याने निर्णय घेऊन या किंवा दोन महिन्यांनी घेऊन या आमची हरकत नाही.
आरक्षणाचा निर्णय घेऊन या, तोपर्यंत आमचे उपोषण सुरुच राहणार आहे. तसेच पुढील दिशा कशी असणार आहे याबाबत आम्ही आमच्या काही लोकांची आज बैठक घेत आहोत असल्याचे जरांगे म्हणाले. अंतरवाली गावात मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या उपोषणाच्या सुरवातीपासून शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर जरांगे यांच्या संपर्कात आहे. तसेच अनेकदा त्यांनी उपोषणाच्या ठिकाणी भेट देऊन सरकारच्या वतीने भूमिका मांडली. दरम्यान, शनिवारी देखील अर्जुन खोतकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्र घेऊन अंतरवाली सराटी गावात पोहोचले होते. तसेच उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, जोपर्यंत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं जरांगे म्हणाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा खोतकर यांना ‘रिकाम्या हात’ परतावे लागले.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंच्या हस्ते जळगावमध्ये दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्याचे अनावरण
परदेशात राहणाऱ्या लोकांनी गणपती कोणत्या तारखेला बसवावा? जाणुन घ्या