सत्तेच्या खुर्चीसाठी २०१९ मध्येच ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना डॅमेज केले, हिंदुत्वाला डॅमेज केले,शिवसेनेला डॅमेज केले,आता आभाळ फाटलंय त्याला कुठे कुठे ठिगळ लावणार अशी घणाघाती टीका शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना उध्दव ठाकरेंवर केली. उध्दव ठाकरे आता त्यांच्या पक्षातील डॅमेज कंट्रोलला सावरण्यासाठी बोलावलेल्या बैठकी संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यथेच्छ खिल्ली उडवली.
ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीसारखा खुर्चीचा अजेंडा नाही तर महायुतीचा अजेंडा हा सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये बदल घडवणे आणि त्यांना न्याय देणे, राज्याला पुढे नेणे आहे. राज्यातील महत्वाच्या पायाभूत सेवा प्रकल्पांचा आढावा घेणारी एकच वॉर रुम आहे. नवीन व़ॉर रुम झालेली नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांकडील खात्यांचा आढावा घेण्यासाठी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. हा कक्ष व़ॉर रुमशी संलग्न आहे. त्यामुळे महायुतीत कोल्ड वॉर नाही तर महाराष्ट्र विकास विरोधी लोकांशी वॉर आहे, असा सणसणीत टोलाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
शासन निर्णय ३१ ऑक्टोबर २०२३ नुसारच उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. ते पुढे म्हणाले की, या राज्याचा विकास करणे हाच महायुतीचा अजेंडा आहे.महायुतीमध्ये कोणतीही समांतर यंत्रणा नाही. उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता कक्षात वैद्यकीय मदतीचे जे अर्ज येतील, त्यांना मदत केली जाईल.यापूर्वी काहीजण मुख्यमंत्री असताना एकदाच मंत्रालयात आले होते याची आठवण करून देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी उध्दव ठाकरे यांना पुन्हा एकदा लक्ष केले. महाकुंभसाठी शिवसेनेचे नेते प्रयागराजला जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
शिवसेना पक्ष हा बाळासाहेबांच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. हा पक्ष कार्यकर्त्यांना बळ देणारा आहे. तुम लढो हम कपडा संभालता है या विचारांचा नाही, अशा उपरोधिक शब्दात त्यांनी उध्दव ठाकरेंना मार्मिक चिमटा काढला.आज शिवसेनेत मोठ्या संख्येने लोक येत आहेत त्यांचे आम्ही स्वागत करतोय, पण ज्यांना सोडून लोक जात आहेत त्यांनी त्यावर आत्मपरिक्षण करायला हवे,असा सल्लाही शिंदे यांनी ठाकरे यांना दिला. बंद पडलेल्या किंवा दिवाळखोरीत गेलेल्या कारखान्यांच्या कामगारांना लवकरात लवकर थकीत देणी मिळावीत, यासाठी राज्याच्या ‘एमआयडीसी’कडून स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिल्याची माहितीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
-किशोर आपटे
हे ही वाचा:
Bhiwandi Crime: जमिनीच्या वादातून जाळ्यात अडकून तरुणाची निघृण हत्या, प्रेमिकेसह पाच जणांना अटक