बीड मधील मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. हा प्रकरण विधिमंडळात देखील खूप गाजले. या प्रकरणात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा सतत नाव चर्चेत आहे. या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर अनेक आरोपी फरार आहे. आता या हत्या प्रकरणातील नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील तीन फरार आरोपींची हत्या झाल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केलाय. आता या दाव्यावर अंजली दमानिया यांना बीड पोलिसांनी नोटिस पाठवली आहे.
नोटिसीत काय आहे नमूद
अंजली दमानिया यांनी फरार आरोपीच्या संदर्भात जो मृत्यूचा दावा केलाय, त्याचे स्पष्टीकरण देण्याच्या सूचना नोटीसद्वारे करण्यात आल्या आहेत. बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी अंजली दमानिया यांना नोटीस बजावली आहे. ज्या मोबाईल नंबरवरून व्हॉइस मेसेज आलेत, तो मोबाईल नंबर, व्हॉइस मेसेज, इतर माहिती आणि पुरावे द्यावे, असे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.
नोटिस मिळाल्यानंतर अंजली दमानिया काय म्हणाल्या
नोटीस मिळाल्यानंतर अंजली दमानिया म्हणाल्या की, एसपींनी मी दिलेली माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडे दिली नसेल. म्हणून त्यांचे काल मला एक पत्र आले आहे. त्यात सगळी माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केला आहे. माझ्याकडे आलेली माहिती मी त्या मिनिटालाच मी एसपींकडे पाठवली होती. त्याचे व्हॉइस मेसेज देखील मी पाठवले होते, सगळे डिटेल्स त्यांना दिले आहेत. पहिले दोन मेसेज जे डिलीट झाले आहेत त्याची देखील माहिती मी पोलिसांना दिली. हे पत्र बघून मला आश्चर्य वाटलं. पण स्थानिक गुन्हे शाखेला ही माहिती हवी असेल तर त्यांना मी माहिती देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रत्येक कम्प्लेंटची पडताळणी केल्यानंतर आम्ही प्रत्येक प्रकरण बाहेर काढू
मी आता ठरवले आहे की, यापुढे तथ्यशोधक आंदोलन करणार आहे. मी दहा ते बारा वाजेपर्यंत दोन तास कलेक्टर ऑफिसच्या बाहेर बसणार आहे. ज्यांना ज्यांना वाल्मीक कराड, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध कम्प्लेंट द्यायची आहे, त्यांना आम्ही सांगणार आहोत की तुम्ही आमच्याकडे येऊन डिटेल्स द्या. प्रत्येक कम्प्लेंटची पडताळणी केल्यानंतर आम्ही प्रत्येक प्रकरण बाहेर काढू, असा लढा आम्ही लोकांपर्यंत आणणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यातील तथ्य पोलिसांकडून बाहेर आले पाहिजे
ज्या गावाच्या नावाचा उल्लेख व्हाइस मेसेजमध्ये आहे. त्या गावात पोलिसांनी पडताळणी केली का? तुम्ही त्या गावात जाणार का? असे विचारले असता अंजली दमानिया म्हणाल्या की, मी जाण्यापेक्षा पोलिसांनी येथे ताबडतोब पथक पाठवणं गरजेचं होतं, ते पाठवले आहे की नाही याचा खुलासा पोलिसांनी करायला हवा होता. पण तो केलेला नाही. ही घटना गंभीर आहे. यातील तथ्य पोलिसांकडून बाहेर आले पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. पण वेळ पडली तर मी तिथे जाणार आहे.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका