बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याप्रकरणाचा तपास वेगाने सीआयडी पोलिसांकडून सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये गठीत करण्यात आलेल्या एसआयटीकडून हा तपास होत आहे.
मात्र, देशमुख कुटुंबियांना तपास अधिकाऱ्याकडून हवी ती माहिती दिली जात नाही, त्यामुळे धनंजय देशमुख यांनी आज टाकीवर चालून आंदोलन केले. तसेच, माझ्या भावासारखंच मलाही मारून टाकलं जाईल. त्यापेक्षा मीच जीवन संपवतो म्हणत त्यांनी संतापही व्यक्त केला. दरम्यान यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घटनास्तळी जाऊन धनंजय देशमुख यांना मन वळवले. तर दुसरीकडे सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याप्रकरणी वाल्मिक कराडला 302 चा आरोपी करावा, अशी मागणी केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि एसआयटी प्रमुखांना फोन करुन तपासात कुणालाही दयामाया दाखवू नका, असे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे एसपी नवनीत कावत आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन करुन मस्साजोग हत्याकांडप्रकरणी आतापर्यंतच्या तपासाचा आढावा घेतला. याप्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये, अशा सूचनात्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तपासात जे-जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, कुणालाही दयामाया दाखवू नका, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी तपास अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आज आम्ही मुख्यमंत्री यांना निवेदन द्यायला आलो होतो. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी निवेदन द्यायला आलो होतो पण मुख्यमंत्र्यांकडे वेळ नव्हता. त्यामुळे, आम्ही निवेदन गेटवर चिटकवलं आणि ठिय्या आंदोलन करु अस सांगितले. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला भेटीची वेळ देण्यात आली, आमचं निवेदनही स्वीकारलं, अशी माहिती रमेश केरे पाटील यांनी दिली. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, यात लक्ष घातलं तर ठीक आहे नाहीतर मराठा ससामाज मुख्यमंत्री असो किंवा कोणी आम्ही त्यांना फिरु देणार नाही, असा इशारा केरे पाटील यांनी दिला. त्यावर, न्याय मिळवुन देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाटील यांना दिलं आहे.