परभणीत झालेल्या दंगलीनंतर नायालयीन कोठडी दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाला आणि त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत आहे. सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली. यावेळी सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबियांकडून त्यांनी घटनाक्रम जाणून घेतला. तसेच त्यांनी बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी देखील त्यांच्या कुटुंबियांशी भेट घेतली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, ” परभणीमध्ये घडलेला प्रकार हा अत्यंत दु:खदायी आहे. पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना अमानुषपणे मारहाण केली. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये देखील त्यांना मारहाण करण्यात आले असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन यामध्ये जे दोषी असतील त्या पोलिसांवर देखील कारवाई करावी आणि गुन्हा दाखल करावा. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही तर आम्ही त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून लढाई लढू. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी जी माहिती दिली आहे ती माहिती अत्यंत गंभीर आहे पोलिसांनी त्यांना अमानुष मारहाण केली आहे. पोलीस कोठडीत असताना जर कोणत्या युवकांनी जेवण मागितले तर पोलीस कर्मचारी त्यांना मारहाण करत होते आणि आता पोट भरली आहे का अशी विचारणा करत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे.
बीडमध्ये घडलेला प्रकार हा अत्यंत गंभीर आहे, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून आरोपींना तात्काळ ताब्यात घ्यावे. आरोपी आमदार असो की खासदार असो अथवा मंत्री असो तो गजाआड गेलाच पाहिजे ही त्या कुटुंबाची मागणी आहे आणि ती पूर्ण झालीच पाहिजे. मयत संतोष देशमुख यांच्या मुलीने २८ तारखेला मोर्चाचे आवाहन केले आहे. त्यामुळे सर्व पक्षातील नेत्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे यामध्ये कुठलेही राजकारण करू नये. संतोष देशमुख मृत्यू प्रकरणात कुणाला सुट्टी देणार नाही, जोपर्यंत आरोपीला ताब्यात घेणार नाहीत तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. सरकार या प्रकरणातील आरोपीला पाठीमागे घालण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने या प्रकरणात न्याय करावा नाहीतर जनता रस्त्यावर उतरेल आणि स्वतःच न्याय करून आणि ते सरकारला परवडणारे नाही. या प्रकरणातील आरोपीला पाठीमागे घालण्याचे काम देखील सरकारकडूनच केले जात आहे, त्यामुळे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपीला ताब्यात घ्यावी.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका