अधिवेशन संपल्यानंतरही रात्री उशिरा खाते वाटप करण्यात आले. खातेवाटपानंतरही आता मंत्र्यांमध्ये पुन्हा एकदा चढाओढ सुरु असताना दिसत आहे.
महाराष्ट्र विधानसभेत महायुती दणदणीत बहूमताने विजयी झाली आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. १५ डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. विस्तारानंतर लगोलग हिवाळी अधिवेशन सुरु झाले. अधिवेशनापूर्वी किंवा त्यादरम्यान खातेवाटप होईल अशी चर्चा रंगली होती. मात्र, अधिवेशन संपल्यानंतर रात्री उशिरा खातेवाटप जाहीर झाले. खातेवाटपानंतरही मंत्र्यांमध्ये पालकमंत्रिपदासाठी चढाओढ सुरूच असताना दिसत आहे.
या खातेवाटपांनंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, ऊर्जा (अपारंपरिक ऊर्जा वगळून), विधी आणि न्याय, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क विभाग आणि इतर मंत्र्यांना नेमून न दिलेली उर्वरित खाती ठेवली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास आणि गृहनिर्माण हे दोन महत्वाचे खाते देण्यासोबतच सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) हे महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ आणि नियोजनसह राज्य उत्पादन शुल्क खाते देण्यात आले आहे. या खातेवाटपानंतर आता मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरु केले आहे.
महायुतीत पालकमंत्रिपदावरुन चढाओढ :
महायुतीत पालकमंत्रिपदावरुन जोरदार चढाओढ सुरु असताना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी मंत्री भारत गोगावले यांनी दावा केला असून आदिती तटकरे या देखील रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. तर संभाजीनगर मधून संजय शिरसाट किंवा अतुल सावे हे देखील पालकमंत्री पदासाठी चढाओढीत सामील आहेत. तसेच बीडमधून धनंजय मुंडे की पंकजा मुंडे यापैकी कोणाला पालकमंत्री पदाची खुर्ची मिळवता येणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबईच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार स्पर्धा :
मुंबईच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळात मुंबई महापालिका निवडणुका होणार आहेत. मुंबईसोबतच उपनगरातील पालकमंत्रिपद आपल्याला मिळावे, यासाठी देखील शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील पालकमंत्रिपदी कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.