दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार झाले त्यातील बहुसंख्या कंपन्या भारतीय होत्या. फक्त एकाच परदेशी कंपनीने महाराष्ट्राशी करार केलेला आहे. २८ भारतीय कंपन्यांनी सामंजस्य करार केला, त्यातील २० कंपन्या महाराष्ट्रातील असून त्यातही १५ मुंबईतील आहेत. या कंपन्या गुंतवणूक करणार हे आधीच ठरले होते, मग त्या सगळ्यांना दावोसला निमंत्रित केले गेले. तिथून महाराष्ट्रात गुंतवणूक आणल्याचा दिखावा केला गेला, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. यावेळी पक्षाच्या कार्याध्यक्षा संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या.
देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी म्हटले होते की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणार असल्याचं म्हटलं होतं आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारभार पाहत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.
सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे कांदा, सोयाबीन, कापूस, दुधाला हमीभावाचे देण्यासंदर्भात म्हटले होते त्याप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना हमीभाव देण्यात यावा. महागाई आणि वित्तीय तूट वाढवणार असेल तर एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा काय उपयोग होणार आहे. महाराष्ट्रातील वाघांचे खूप हाल होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार ऑपरेशन टायगर राबवणार असेल तर चांगली गोष्ट आहे. लाडकी बहीण योजनेत बांगलादेशी महिलांचे फॉर्म निवडणुकीआधी का दिसले नाही? असा प्रश्न देखील यावेळी सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा :