spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

आधी यवतमाळच्या वाघाला पकडा, ओमराजेंनी लगावला शिवसेनेच्या मंत्र्यांना टोला

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजवंदन सोहळ्यासाठी धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिवला गेले होते. त्यांनी धाराशिवच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. ते म्हणाले, भविष्यामध्ये तुम्ही बघाल पुढे काय होतं ते. धाराशिव जिल्ह्यातदेखील काही बदल झाला तर तुम्हाला वेगळं काही वाटायला नको, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच, काही दिवासांपूर्वी मंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर व ऑपरेशन धनुष्यबाण सुरु असून अनेक आमदार खासदार पक्षात येणार असल्याचेही म्हटले होते.

आता त्याच अनुषंगाने धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना सत्ताधारी व शिवसेनेच्या मंत्र्यांना टोला लगावला. धाराशिवच्या बालाघाटमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून वाघाचे वास्तव्य असून तो वाघ अद्यापही वन विभागाला पकडता आला नाही. त्यामुळे, आधी यवतमाळच्या वाघाला पकडा, असा टोला ओमराजे निंबाळकर यांनी लगावला.

शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू झालं असून शिवसेना ठाकरे गटातील अनेक आमदार-खासदार आमच्या संपर्कात आहेत. योग्यवेळी ते आमच्या शिवसेना पक्षात प्रवेश करतील असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले होते. मात्र, ठाकरेंच्या खासदाराने ऑपरेशन टायगरची खिल्ली उडवली आहे. उदय सामंत उपमुख्यमंत्री होणार आणि शिवसेना फुटणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतरच ऑपरेशन टायगरची बातमी पेरल्याचं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं. शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ची खासदार ओमराजे निंबाळकर यांनी खिल्ली उडवली असून कसलं ऑपरेशन टायगर. यवतमाळहून आलेला वाघ इकडं हिंडायलाय, त्याला आधी पकडा, ते ऑपरेशन टायगर करा. त्याच्यासोबतच दोन बिबटे आलेले आहेत, असा मिश्कील टोला ओमराजे निंबाळकर यांनी सत्ताधाऱ्यांना व शिवसेनेच्या मंत्र्यांना लगावला आहे.

खासदार फुटीची चर्चा ओमराजे फेटाळली
दरम्यान, धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यातील आमदार-खसादारांच्या शिवसेना प्रवेशाबाबत भाष्य केलं होतं. त्यावर, उत्तर देताना माझ्याशी कोणीही संपर्क साधला नाही, असे म्हणत धाराशिवमधील आमदार-खासदार फुटीची चर्चा देखील ओमराजे यांनी फेटाळली. संघर्ष आणि संकटाचा काळ आहे, या काळात आम्ही पक्षासोबतच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, धाराशिवचे खासदार आमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे शिवसेना पक्षफुटीनंतरही उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले. तर लोकसभा निवडणुकीत ओमराजे राज्यात दुसऱ्या क्रमांकाने सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत. तर, आमदार कैलास पाटील हेही विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत.

हे ही वाचा : 

एस. टी च्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss