भाजपाविरोधात देशातील अनेक राजकीय पक्ष एकत्र आले असून त्यांनी इंडिया आघाडीअतंर्गत मोट बांधली आहे. या इंडिया आघाडीची बैठक उद्या म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी मुंबईतील ग्रॅण्ड हयात येथे होणार आहे. या बैठकीसाठी देशभरातील नेते मुंबईत होणार असून आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती या माध्यमातून ठरवण्यात येणार आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरस पक्षाचे माजी अध्यक्ष फारुक अब्दुल्ला मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत येताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
देशभरातील अनेक नेते येथे येणार आहेत. हा देश वाचण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. हा देश आपल्या सर्वांचा आहे. एकता आणि अनेकता महत्त्वाची. अनेकता मजबूत असेल तर एकता मजबूत होईल. भारताच्या समस्या दूर करण्याकरता आपल्याला सर्वांना अनेकताला मजबूत करायचं आहे”, असं फारुक अब्दुल्ला म्हणाले.यावेळी फारुक अब्दुल्ला यांना किती जागा जिंकू शकाल असा प्रश्न विचारण्यात आला. कारण, भाजपाने ३०० पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे. त्यावर फारुक अब्दुल्ला म्हणाले की, “भाजपाकडून नेहमीच असे दावे केले जातात. त्यांना देवाकडून संदेश प्राप्त झाला असेल की ते एवढ्या जागा जिंकणार आहेत. आम्हाला अद्यापही देवाचा फोन आलेला नाही, देवाचा फोन आला की आम्ही कळवू”, असंही मिश्कीलपणे फारुक अब्दुल्ला म्हणाले.
“जर माझ्याकडे जीन असता तर मी त्याला विचारलं असतं की किती जागा जिंकू? असं कोणतं मशीन माझ्याकडे असतं तर मी मशिनला विचारलं असतं की आम्ही किती जागा जिंकू, आम्ही जिंकू की नाही?”, असंही अब्दुल्ला म्हणाले. राम मंदिराचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी दगडफेक केली जाईल, असा दावा केला जातोय. यावर फारुक अब्दुल्ला म्हणाले की, या जगात काहीही होऊ शकतं. पण आरामात निवडणुका व्हायला हव्यात.
हे ही वाचा:
ठाकरे कुटुंबियांवर चढवला नितेश राणेंनी हल्लाबोल
दहीहंडीच्या धर्तीवर ५० हजार गोविंदांना मिळणार विमा संरक्षण