मुंबईसह नागपूरपर्यंतच्या महापालिका आम्ही स्वबळावर लढू”, अशी मोठी घोषणा करतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी स्वबळाचा नारा दिला होता. मात्र आता संजय राऊत यानी चोविस तासांत घुमजाव करत भुमिका बदलण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेवर भाष्य करताना आज संजय राऊत यानी म्हटले आहे की, मी शिवसेनेचा नेता आहे हे जर काँग्रेसच्या नेत्यांना समजले नसेल तर मग पाहावे लागेल, ते म्हणाले की, संजय राऊत शिवसेनेचा नेता आहे, हे जर काँग्रेसच्या नेत्यांना समजले नसेल तर मग पाहावं लागेल. उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख आहेत, ते सर्वांशी बोलतात. शाखाप्रमुख विभागप्रमुख या सर्वांशी ते बोलतात. दुसरी गोष्ट काँग्रेसच्या नेत्यांनी माझं वक्तव्य नीट ऐकलं पाहिजे. त्यांनी ऐकण्याचीही सवय ठेवावी. ऐकण्याची सवय ही आयुष्यात फार चांगली असते”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
मी फक्त इतकंच सांगितलं की लोकसभेसाठी इंडिया आघाडी बनवली. विधानसभेसाठी महाविकास आघाडी बनवली. आता स्थानिक संस्थांच्या निवडणुका आहेत. ती कार्यकर्त्यांची निवडणूक असते. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे की आम्ही वेगळं लढावं, असे संजय राऊत म्हणाले. ते म्हणाले की “बूथ लेव्हलला काम करण्य़ाची आम्हाला गरज” “लोकसभा आणि विधानसभा वेगळी निवडणूक आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये वेगळं लढलं तर आमची ताकद वाढेल. आम्ही म्हणालो नाही, महाविकास आघाडी तुटली. त्यामुळे कुणाला मिरची लागण्याची गरज नाही. भाजपसोबत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगळ्या लढलो होतो. बूथ लेव्हलला काम करण्य़ाची आम्हाला गरज आहे. तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आम्हाला वेळ द्यायचा आहे. आम्ही जर वेगळे लढलो, तर आमच्या पक्षाचे जे चिन्ह आहे, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल. अजूनही लोक या निवडणूक चिन्हाबद्दल संभ्रमात आहेत. ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हापरिषद, महानगरपालिका या निवडणुकांमधून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. या साधारण सर्वच पक्षांचा निर्णय असतो”, असेही संजय राऊतांनी म्हटले.
संजय राऊत यानी त्यापूर्वी मात्र कालच म्हटले होते की, “मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल. एकदा आम्हाला पाहायचंच आहे. नागपूरलाही आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिले आहेत. आताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता असं आमचं ठरतंय की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल… कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. आघाडीमध्ये लोकसभा, विधानसभेत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला किंबहुना पक्षाच्या वाढीला बसतो. महापालिका, जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीत स्वबळावर लढून आपपले पक्ष मजबूत करावेत”, असे संजय राऊत म्हणाले होते.