मराठा आरक्षक आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. अंतरवाली सरातीमध्ये २५ जानेवारीपासून त्यांचे उपोषण सुरु आहे. त्यांची तब्येत खालावली आहे. संतोष देशमुख यांच्या आईच्या आग्रहामुळे काल पाणी पिले. उपोषण स्थळी त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांना उपचार घेण्याचा आग्रह धरला होता. भाजप आमदार सुरेश धस देखील मंगळवारी त्यांना भेटले. त्यांनंतर आज मनोज जरांगे यांनी सरकारला मोठे आवाहन केले आहे. त्यांच्या शब्दांनी अनेकांच्या काळजात चर्र झाले आहे.
आमच्या मागण्या पूर्ण होईल की नाही
फडणवीस यांना एकच म्हणणं आहे की,आमच्या मागण्या पूर्ण होईल की नाही ते सांगावं अन्यथा वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल, असे ते म्हणाले. आपल्या म्हणण्याचा दुसरा कोणताही उद्देश नाही, आपला उद्देश फक्त मागण्या पूर्ण होण्याचा आहे. मुख्यमंत्र्यांनी मागण्या पूर्ण होईल की नाही हे सांगावं. मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी मागे पुढे सरकू शकतो पण स्वार्थासाठी नाही, यातच जातीच कल्याण आहे. आमच्या मागण्या पूर्ण होईल की नाही ते मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगावं, असे आवाहन त्यांनी केले.
आमच्या एकाही बांधवांचा जीव जायला नको
आम्हाला पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येईल असं वाटत नव्हतं. आमच्या एकाही बांधवांचा जीव जायला नको पण मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतोय, असा संताप जरांगे यांनी व्यक्त केला. मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करणार आहात की नाही, अशी वारंवार विचारणा त्यांनी केली. यापूर्वी सुद्धा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोंडसुख घेतले होते. अजून त्यांच्या शब्दांना धार आलेली नाही. उपोषण जसं वाढेल, कदाचित तसा राज्य सरकार आणि आंदोलकांमध्ये वाद वाढू शकतो.
तोंड लपवू नका
सगळे मेल्यावर सांगू नका दहा दिवसांनी सांगितल्यापेक्षा आजच सांगून टाका. तोंड लपवू नका. संध्याकाळपर्यत सांगून टाका, म्हणजे उपोषण सोडून देऊन दुसरा मार्ग स्वीकारता येईल, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले. तुम्ही मराठ्यांना सुखाने खाऊ दिल नाही तर तुम्हाला 5 वर्ष सुखाने खाऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला, संध्याकाळपर्यत सांगून टाका, अंमलबजावणी करायची की नाही सांगून टाका. तोंड लपवू नका, असे ते म्हणाले.
हे ही वाचा :