लाडकी बहीण योजनेचा हप्ता नुकताच राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकी पूर्वी महायुती सरकारकडून करण्यात आली. विरोधकांकडून ही योजना बंद होणार असल्याचं सतत आरोप केले जात आहे. ही योजना विधानसभा निवडणुकीपुरता जुमला असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने देखील महालक्ष्मी योजना सुरु करणार असल्याचा म्हंटल होत. या योजने अंतर्गत महिलांना प्रतिमाह ३००० रुपये देण्यात येणार असल्याचे आव्हान देण्यात आले होते. आता ही योजना लवकरच बंद होणार असल्याचा दावा माजी खासदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केला आहे.
कोणता दावा विनायक राऊत यांनीं केला?
महाराष्ट्र कर्जामध्ये डुबलेला आहे, त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सांभाळण्याचं आव्हान अजित दादा कसं पेलणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे, असे वक्तव्य राऊतांनी केले. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकींपर्यंत लाडकी बहीण योजनेचा प्रयोग ते नक्की करतील. त्यानंतर ही योजना बंद पाडतील, असा दावा राऊतांनी केला. या योजनेचा डोलारा सांभाळणे जिकरीचे काम असल्याचा दावा त्यांनी केला. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका संपल्या की ही योजना बंद करण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला.
मुंबई महापालिका भाजपला हडप करायची आहे
मुंबई महापालिकेवर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा डोळा आहे. त्यांना महापालिका हडप करायची आहे, असे ते म्हणाले. मात्र मुंबईकर जनता जागृत आहे. कोणत्याही परिस्थितीत या लुटारूंच्या हातात मुंबईकर जनता महापालिका देणार नाही. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शिवसेना उबाठा महापालिकेत निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त
विनायक राऊत यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर देखील चिंता व्यक्त केली. संतोष देशमुख यांच्या हत्येमागे कोण आहे, हे दिसून आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची गांभीर्याने दखल घेतील याची मला खात्री आहे. पण मागच्या दोन महिन्यात ज्या पद्धतीने हत्या होत आहेत, लैंगिक अत्याचार, खून होत आहेत, दरोडे पड्तायेत, त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झालेली आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही, गुन्हेगार मोकाट सुटलेले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
केंद्रातील राजकारणावर देखील निशाणा
यावेळी विनायक राऊत यांनी केंद्रातील राजकारणावर देखील निशाणा धरला. बीडमध्ये ज्या पद्धतीने 2 हजार पेक्षा रिव्हॉल्व्हरचे परवाने ज्या अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत, त्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, फौजदारी गुन्हे दाखल करावेत. देशामध्ये खूप अराजक निर्माण होत आहे. भाजपच्या केंद्रीय मंडळाबाबत खूप नाराजी आहे, असं दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात काहीही घडू शकेल, असे संकेत दिले.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका