मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी पत्र लिहून मराठा आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली आहे. राज ठाकरेंनी मनोज जरांगे यांना उपोषण सोडण्याचं आवाहन केलं आहे. “निगरगट्ट, असंवेदनशील शासनासाठी तुम्ही स्वत:च्या जीवाची बाजी लावू नये, उपोषण सोडा. तब्येत जपा. आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे”, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरे यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे.
राजकीय व्यवस्था भकास आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवं आहे. ते एकदा मिळालं की हे आपली सगळी आश्वासनं विसरणार अशी ह्यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. अशा खोटारड्या, बेफिकीर लोकांना काही समजत नाही.
आपली अंतरवाली सराटीला भेट झाली तेंव्हाच मी आपल्याला बोललो होतो की ज्यांना विकासाची फळं आपण चाखू दिली नाहीत त्यांना आपण आरक्षणाची संधी दिली पाहिजे. ह्या संदर्भात आर्थिक निकषांवर आरक्षण असावं अशीच आमची अगदी पहिल्यापासून भूमिका आहे. आपल्या मुला-मुलींना प्रगत शिक्षण, सन्मानजनक रोजगार उपलब्ध करून देणं अगदी सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी जागरूक रहायला पाहिजे. आपण संस्था उभ्या करणार आणि त्यात बाहेरच्या राज्यातली मुलं शिकणार.
आपण रोजगार निर्माण करणार आणि त्यावर परप्रांतीय हक्क दाखवणार हे थांबवलं पाहिजे. या आपल्या शहरामध्ये नोकऱ्या कोणकोणत्या आणि कुठं आहेत हे ही आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांना आणि तरुणींना माहित नसतं. आपल्याला ह्या बाबतीत बरंच काम करायचं आहे म्हणून आत्ता उपोषण करून आपला जीव पणाला लावू नका.
हे ही वाचा :
राज्यातील ज्वलंत प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवा, नाना पटोले
World Cup 2023, भारताच्या विजयाने सेमीफाइनलचा मार्ग झाला मोकळा