विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस झाले आहे. महायुतीने मोठ्या प्रमाणात बहुमत मिळवला आहे. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. मात्र सध्या राज्यात सोलापूर जिल्ह्यात असलेल्या माळशिरस मतदारसंघातल्या मारकडवाडी गावाची सध्या चर्चा सुरु आहे. कारण या गावात बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्यात येत आहे. ३ डिसेंबरला मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर फेरमतदान होणार आहे. तसेच २ तारीख ते ५ तारीख कलाम १६३ लागू करण्यात आली आहे.
‘ईव्हीएम’ वर राज्यातील बहुतांश नेत्यांनी शंका व्यक्त केली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्ये बाबा आढाव यांनी ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा आरोप करत उपोषण आंदोलन सुरु केले होते. लोकसभा आणि विधानसभेच्या निकालात इतका फरक कसा असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत तीन दिवस उपोषण आंदोलन केले होते. शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, त्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी भेटीस गेले होते. मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पेत आपलं उपोषण सोडलं. आता ‘ईव्हीएम’ वर संशय घेत माळशिरस मतदारसंघाच्या गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्याची इच्छा व्यक्त केली. आणि ३ डिसेंबरला मतदान प्रक्रिया होणार आहे.
गावकऱ्यांचा नेमका दावा काय?
उत्तम जानकर यांचे मताधिक्य घटण्यामागे ईव्हीएमचे कटकारस्थान असल्याचा गावकऱ्यांना संशय आहे. मारकडवाडीमध्ये जानकर यांच्या बाजूने 80 टक्के मतदान झाले मात्र ईव्हीएममधून वेगळीच आकडेवारी समोर येत आहे. निवडणुकीत महायुतीच्या राम सातपुते यांना 843 मते, तर शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर यांना 1003 मते मिळाली आहेत. या मतदानावर गावकऱ्यांना संशय आहे. त्यामुळे पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवून ईव्हीएमची पोलखोल करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. सातपुते यांना मिळालेल्या 843 मतांवर संशय असून, त्यांना गावातून फारतर शे-दीडशे मते मिळायला पाहिजे होती, असे गावकऱ्यांचा दावा आहे.
गावात कलम १६३ लागू..
माळशिरस मतदारसंघातून शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर विजयी झाले आहेत. पण मारकडवाडी गावामध्ये महायुतीच्या राम सातपुतेंनी मोठी मतं मिळवली. त्यामुळे शंका आलेल्या गावकऱ्यांनी तिथे बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्याची तयारी दर्शवली आहे. उद्या 3 डिसेंबरला मारकडवाडी गावात मतदान प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. मात्र प्रशासनाने याला विरोध केला आहे. त्यामुळे गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच 2 तारीख ते 5 तारीख कलम 163 ही लागू करण्यात आले आहे.
मतदानाचे गावात लागले फलक..
बॅलेट पेपरवरील मतदानासाठी गावात फलक लावून मतदानाप्रमाणे सर्व प्रक्रिया घेतली जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या मतपत्रिका छापण्यास दिल्या असून, गावातील प्रत्येकाने आपण या निवडणुकीत ज्याला मतदान केले, त्यालाच मतदान करण्याचे आवाहन केले जाणार आहे. राज्यातील बहुतांश नेते ‘ईव्हीएम’वर शंका उपस्थित करू लागल्याने मारकडवाडी हे राज्यातील पहिले गाव असून, ज्या गावाने थेट बॅलेट पेपरवर मतदान घेऊन ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ करण्याचे पाऊल उचलले आहे. आता उद्या ३ डिसेंबरला या गावात काय घडतंय याकडे सर्वांचे लक्ष आहे.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule