पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी ८. ५ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश काढूनही नगर-नाशिक विभागातील राजकीय दबावामुळे जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येत नसल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, आता याच पाणी प्रश्नात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उडी घेतली आहे. मराठवाड्याला त्याच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे, यासाठी आता रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा शिरसाट यांनी दिला आहे. सोबतच न्यायालयात देखील न्यायालयीन लढाई लढणार असल्याचं शिरसाठ म्हणाले आहे.
यावेळी बोलत असताना संजय शिरसाट म्हणाले की, पाण्यासाठी आडवे येत आहे त्यांना इशारा देत असून, आम्ही देखील।लढा उभा करणार आहे. तसेच, वरील नवीन धरण बनू नयेत अशी आमची मागणी आहे. आहेत त्या धरणातून पाणी सोडले जात नाही, त्यामुळे नवीन धरणं झाल्यावर आणखी पाणी अडवले जाईल. पाणी मिळावे म्हणून आता आम्ही रस्त्यावर उतरणार आहे. यासाठी आम्ही मागे पुढं पाहणार नाही.तर, सरकारला विनंती केली आहे की, आम्हाला रस्त्यावर उतरू देऊ नका. तसेच, मराठवाड्यातील नेत्यांनी पक्ष बाजूला ठेवून, आपल्या हक्काच्या पाण्यासाठी एकत्र येण्याचे मी आवाहन देखील करत आहे.
दरम्यान याचवेळी शिरसाट म्हणाले की, अजित दादा यांच्या आईनी त्यांच्या मुला बद्दल मुख्यमंत्री होण्याची भावना व्यक्त केली आहे. प्रत्येक आई अशी भावना व्यक्त करते. माझा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असे सर्वच आईला वाटते,असे शिरसाट म्हणाले. तर, जनता आता आंदोलनाला कंटाळली आहे. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांनी आता आंदोलन केले तर, त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल,असेही शिरसाट म्हणाले. पुढे शिरसाट म्हणाले की, मराठवाड्याला पाणी मिळाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. न्यायालयाने देखील आदेश दिला आहे, पण काही लोकांचा याला विरोध आहे. आमच्या हक्काचं पाणी द्यावे आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पाणी देण्यात यावे. तर, हक्काचे पाणी मराठवाड्याला मिळावे यासाठी आम्ही देखील न्यायालयात जाणार असून, वकिलांची फौजी उभी करणार आहे. आम्हाला आता लढा उभा करावं लागणार असल्याचे शिरसाट म्हणाले आहे.
हे ही वाचा :
Diwali 2023, जाणून घ्या यंदाच्या लक्ष्मीपूजनाची तारीख, मुहूर्त आणि महत्त्व
Ahmednagar – परिवहन विभागाचा अनागोंदी कारभार