Friday, April 19, 2024

Latest Posts

श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली मतदारसंघावरून दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आखणी करण्यास सुरुवात केली आहे. मतदारसंघात आढावा बैठका घेत पक्षाचे मजबुतीकरण करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आपली कंबर कसली आहे. जागा वाटपाच्या चर्चा सध्या सुरू असून त्या जागांवर आपली वर्णी लावण्यासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ लागली असल्याचे दिसते. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे याचे प्रतिनिधीत्व करतात. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मतदारसंघात विकास कामांवर भर दिल्याचे दिसून येते. त्यामुळे ते कल्याण मतदार संघावरील दावा सोडणार नाहीत, असेच सध्या दिसून येत आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघातून आता कोण लढणार? अशी चर्चा कल्याण – डोंबिवली – अंबरनाथ परिसरात सुरू झाली आहे. कल्याण शिवसेनेचा बालेकिल्ला असून तो अबाधित ठेवण्यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. शिंदे गट व भाजपची युती असल्याने या मतदारसंघावर भाजपने दावा केल्यास सध्याचे विद्यमान खासदार डॉ. शिंदे हे ठाण्यातून निवडणूक लढवून भाजपला ही जागा देण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी दोनवेळा कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. त्यामुळे ही जागा भाजप लढवू शकते, अशी चर्चा आहे. डोंबिवली विद्यमान आमदार आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. या मतदारसंघावर भाजपाने आपले लक्ष केंद्रीत केल्यानंतर महाविकास आघाडीने देखील या ठिकाणी चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. आता यावरच भाजपकचीही प्रतिक्रिया आली आहे. हे तुम्ही किंवा मी ठरवू शकत नाही. पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील, ती वेळ २०२४ मध्ये येईल, असे भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. त्यामुळे अद्याप कल्याण लोकसभेची जागा आणि उमेदवारी भाजपनी सोडली नाही हेच दिसून येते आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार उभा करणार असे कोण म्हणाला त्याचं नाव घ्या. भाजप नेत्यांचे जे लोकसभा निहाय दौरे आहेत ते केंद्राकडून देण्यात आले आहेत. प्रत्येक पक्षाला आपली पक्ष संघटना बांधण्याचा अधिकार आहे. भाजप त्यांची पक्ष संघटना बांधतेय. जिथे जिथे शिवसेनेचे खासदार आहेत, त्या ठिकाणी शिवसेनेचेच खासदार निवडणूक लढणार हे केंद्राच्या आणि राज्याच्या नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात दौरा करणारे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे माझे मित्र आहेत, ते जेव्हा जेव्हा दौऱ्यावर आले तेव्हा मी त्यांचे स्वागत केले. त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

Latest Posts

Don't Miss