शनिवारी पालकमंत्री पदाची नियुक्ती करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून एकनाथ शिंदे नाराज असून त्यामुळेच ते दरेगावला निघून गेले अशी चर्चा सुरु झाल्यानंतर त्यावर स्वतः शिंदेनी स्पष्टीकरण दिलं आहे. गावी आलो म्हणजे नाराज झालो असं काहीजण म्हणतात. पण या जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी, पर्यटन जिल्हा म्हणून विकसित करण्यासाठीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दरेगावात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महायुती भक्कम असून त्यासंदर्भात काही अडचणी आल्यास तीनही नेते एकत्र बसून निर्णय घेऊ असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक होते. त्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, भरत गोगावलेंनी अनेक वर्षे रायगडसाठी काम केलं आहे. त्यामुळे अपेक्षा ठेवण्यात वावगं काय आहे.
महाबळेश्वरचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गावी
नाराज झालो म्हणून नाही तर नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गावी आलोय हा सगळा मोठा परिसर, 235 गावांचा पर्यटन विकासाचा हा प्रकल्प आहे. पर्यटनाचा जिल्हा विकसित व्हावं म्हणून काम करतोय. या भागाचा कायापालट करणे, या लोकांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवणे हाच आपला उद्देश आहे.
हे ही वाचा :
सरकार स्थापनेवेळी एकनाथ शिंदे रुसले तेव्हाच उदय होणार होता Sanjay Raut यांचा भाजपला टोला
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला नाराजी नाट्यामुळे स्थगिती