बीड जिल्यातील सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. या हत्याप्रकरणामुळे बीड जिल्हा देखील चांगलाच चर्चेत आला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराड हाच बीडचा शाडो पालकमंत्री असून बीडमधील अधिकाऱ्यांची बदली, पोलीस दलातील अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्याचं काम त्यांच्याकडून होत असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांत करण्यात आल्याचा पाहायला मिळाला. त्यातच, राज्याचे मस्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांना पालकमंत्री पद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भेट दिली. मंत्री राणेंनी येथे पत्रकार परिषद घेत अधिकाऱ्यांना राणे स्टाईलने थेट इशारा दिला. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनामध्ये बीडची लॉबी काम करत असल्याची माहिती माझ्याजवळ असल्याचं त्यांनी म्हटलं.
जिल्हा प्रशासनात बीडची लॉबी काम करत असल्याची माहिती माझ्याजवळ आली आहे. बीड आपल्या राज्यातील महत्त्वाचा जिल्हा आहे, बीड जिल्ह्याचं नाव वापरून इथे कोणी दादागिरी करत असेल तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोहचू, अशा शब्दात मंत्री नितेश राणेंनी थेट इशारा दिला आहे. तसेच, काही गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत, त्या आता पत्रकार परिषदेत बोलू शकत नाही. माझ्या कृतीतून तुम्हाला यावर कसा वचक ठेवायचा हे तुम्हाला दिसेल. आम्ही मॅनेज होणाऱ्यांपैकी नाही, आम्हाला विकत घेण्याची कोणामध्ये क्षमता नाही. नियम बाह्य काम करणाऱ्या अधीकाऱ्याला घरी बसवणार, असा थेट इशारा अधिकाऱ्यांना नितेश राणे यांनी दिला आहे.
पुढे ते बोलले, जिल्ह्यात गेल्या काही वर्षे प्रशासनावर वचक नसल्यामुळे अवैध व्यवसाय सुरू झाले आहेत. त्यावर येणाऱ्या काळात कसा वचक बसवतो ते पहा. आता कणकवलीत ज्या दोन बांगलादेशी महिला पकडल्या त्या एका लॉजवर पकडल्या. मात्र, त्या रेल्वे स्टेशनला पकडले गेल्याचं दाखवल. या मागचा सूत्रधार आणि पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाणार. जिल्ह्याची प्रतिमा व भावी पीढीसोबत कोणी मस्ती करून दाखवावी, हे माझ ओपन चॅलेंज आहे, त्यांचा थेट सामना नितेश राणेंशी आहे, असा सज्जड दमच नितेश राणेंनी अधिकाऱ्यांसोबतच अवैध धंदे करणाऱ्यांना दिला.जिल्ह्यात यापुढे कोणी ड्रग्स विकायची हिंमत करत असेल तर त्याचे हात कापले जातील. जिल्ह्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परजिल्ह्यातील फेरीवाले जे यु.पी. बिहारमधून येत आहेत त्यांचा येण्यामागचा हेतू काय हे यापुढच्या काळात तपासून कारवाई केली जाईल असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :
सरकार स्थापनेवेळी एकनाथ शिंदे रुसले तेव्हाच उदय होणार होता Sanjay Raut यांचा भाजपला टोला
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला नाराजी नाट्यामुळे स्थगिती