महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचे १३२ आमदार निवडून आले होते. त्यामुळे मुख्यमंत्रीपद भाजपाला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी काल ५ डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. २०१४ ते २०१९ पहिला कार्यकाळ होता तर २०१९ साली फक्त ८० तास हा त्यांचा दुसरा कार्यकाळ राहिला. आता ५ डिसेंबर २०२४ पासून त्यांचा तिसरा कार्यकाळ सुरु झाला आहे. त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव झाला होता. ४८ पैकी त्यांचे फक्त १७ खासदार निवडून आले होते. मात्र, सहा महिन्यात विधानसभा निवडणुकीला चित्र बदलले. त्यामागे एक महत्त्वाचे कारण होते ते म्हणजे, लाडकी बहीण योजना. महायुती सरकारने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कल्याणकारी योजना आणल्या. पण त्यात सर्वात प्रभावी आणि यशस्वी ठरली ती म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनांच्या माध्यमातून दार महिन्याला महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होतात. महायुती सरकारने त्यासाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजना सुरु राहील का? असा प्रश्न अनेकांच्या मनात सुरु आहे. महायुतीच्या नेत्यांनी या योजना सुरु राहतील असे आश्वासनही दिले होते. महायुतीने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातून महिन्याला १५०० रुपये ऐवजी २१०० रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीला त्याचा आश्वासनाची आठवण करून दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून २१०० रुपये देणार आहेत. नवीन वर्ष सुरु होतंय. डिसेंबर महिना सुरु झालायं, पण शक्य असेल तर डिसेंबरपासूनच किंवा १ जानेवारी २०२५ पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात महिना २१०० रुपये जमा करा. आम्ही तर म्हणतो ३ हजार रुपये द्या, कारण आम्ही सत्तेवर आलो असतो तर महिना ३ हजार रुपये देणार होतो”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हे ही वाचा:
११ डिसेंबरला आमदारांचा होणार शपथविधी; कुणाच्या वाट्याला कोणते मंत्रिपद?
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.