महाराष्ट्रात घडणाऱ्या घटनांबद्दलची अस्वस्थता फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आहे. दिल्लीतील अनेक खासदार, विचारवंत आणि माध्यम विचारतायत की महाराष्ट्रात चाललंय काय ? अशा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे (NCP Sharad Chandra Pawar Party Working President and Member of Parliament Supriya Sule) यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बीडमधील हत्येबाबत दिल्लीमध्येही प्रचंड चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने एक अधिकृत, पारदर्शक आणि सत्य निवेदन महाराष्ट्राला देण्याची गरज आहे. आतापर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये मी पालकमंत्री पदाची एवढी चर्चा कधीही ऐकलेली नाही. खात्याबाबत जेवढी चर्चा होत नाही तेवढी पालकमंत्री पदाबाबत होतेय. पालकमंत्री पदाची जबाबदारी द्या आणि कामाला लागा त्याबद्दल एवढी चर्चा का ? असे सुप्रिया सुळे यांनी बोलताना सांगितले. पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीसांकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत, कारण मी त्यांच्याकडे एक गंभीर राजकारणी आणि प्रशासक म्हणून पाहते. निवडणुकीमध्ये लोक बोलत होते की, DPDC चे पैसे वळवले जातायत. मला वाटतं आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा सत्य काय आहे हे लोकांना कळावं यासाठी सरकारने श्वेतपत्रिका काढावी. अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
जीएसटी परिषदेची बैठक हा गंभीर विषय असून जीएसटी परिषदेच्या बैठकीला महाराष्ट्र सरकारमार्फत कोण गेलं आणि सरकारने काय मुद्दे मांडले हे आम्हाला कळलं नाही. सत्ता ही काही मिरवायची गोष्ट नसते. सत्ता ही सेवा आहे. जनतेच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्याची ती संधी आहे. बीड प्रकरणांमध्ये स्थानिक लोकांची काही मागणी असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मित्र पक्षांनी योग्य आणि संवेदनशील निर्णय घ्यावा. असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका