राज्यातील सरकार कबुली देतंय की ४०० कोटी रुपयांचा पीक विम्याचा घोटाळा झाला आहे आणि त्याच सरकारमधील आमदार म्हणतायत की ४०० नव्हे तर ५००० कोटीचा झालाय. हा खूप गंभीर विषय असून तो मी, संसदेत मांडणार आहे. तसेच सरकारने हार्वेस्टरमागे 8 लाख रुपये मागितले हे अतिशय गंभीर आहे स्वतः भ्रष्टाचार होतो हे मंत्रीच कबूल करत आहेत. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात सातत्याने भ्रष्टाचार होतोय हे महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री कबूल करतायत मग त्याची चौकशी का होत नाही? हे मी पार्लमेंट सेशनमध्ये मांडणार. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मला दिल्लीला पाठवलंय त्यामुळे काळ्या मातीशी इमान राखणं आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं हे माझं कर्तव्य आहे. संसदेमध्ये महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी न्याय मागणार. या अधिवेशनानंतर महाराष्ट्राला न्याय मिळाला नाही तर आम्हाला आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नाही याबाबत जर पत्रकारच अस्वस्थ होऊन विचारत असतील तर त्यांच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. लोकांची भावना आहे की महाराष्ट्रात वर्दीची भीतीच राहिली नाही. हे अतिशय चिंताजनक आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था काही राहीली नाही. सरकारला दोन महिने झाले. ते 100 दिवसांचा प्रोग्राम देणार होते, आज 60 दिवस झाले आहेत. इंदापूरवर अन्याय झाला आहे. पालकमंत्रीपद दिले नाही. मी सरकारला बोलणार आहे. सरकार स्थापन होऊन 60 दिवस झाले तरी कोणतेच काम झाले नाही, असे सुप्रिया सुळे यांनी बोलताना सांगितले आहे. पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निधी नसल्यामुळं निरा भीमा नदी जोड प्रकल्प ठप्प आहे. निधी का मिळत नाही? निधी नसल्यामुळं शेतकऱ्यांचा डीपी बसवला जात नाही. विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांच्या पराभवाला अनेक कारणं आहे. उत्तम जानकर निवडून आले तरी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळं मला निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्न पडला आहे. लोक बॅलेटवर निवडणुका घेण्याची मागणी करत आहेत. माझं म्हणणं आहे की समाजामध्ये जर अस्वस्थता असेल आणि जर लोकांची मागणी असेल की निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात. यात अडचण काय ? असेही सुप्रिया सुळे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, सुरेश धस, अंजली दमानिया, नमिता मुंडदा हे लोक आणि काँग्रेसचे लोक सातत्याने वाल्मीकरांना 302 मध्ये आरोपी करा हा मुद्दा मांडत आहेत. राज्यातील 6 पक्ष सातत्याने मागणी करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी याचे उत्तर दिले पाहिजे. सरकार का खुनी लोकांना लपवत आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे यावर सविस्तर बोलताना म्हणाल्या की,बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे यांच्या एनकाउंटरवरून न्यायालयाने पोलिसांना दोषी ठरवलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे, आज-काल जेल ऑफ चॉईस ही नवीन स्कीम सरकारने काढली आहे. प्रचंड अस्वस्थ करणारी परिस्थिती राज्यात आहे. एवढा मोठा जनाधार या सरकारला मिळाला आहे. सातत्याने सर्वसामान्य माणसांना फसवल्याचा फील का येतोय असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
हे ही वाचा :