राज्य सरकारकडून मागील आठवड्यात रविवारी (दि. 18) सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले आहे. रायगडमध्ये अदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे रायगडमध्ये भरत गोगावले आणि नाशिकमध्ये दादा भुसे यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्ती केली होती. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला. दरम्यान पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदे हे नाराज होऊन साताऱ्यातील दरे गावात निघून गेल्याची चर्चा देखील रंगली होती.
आता वैधकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचा पालकमंत्रीपदी संधी न मिळाल्याने त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही. कोल्हापूरचे पालकमंत्री शिवसेनेकडे गेलं असून सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे आहे. त्यामुळे आबीटकरांच्या निवडीवर मुश्रिफांची नव्हे, तर शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांचीही नाराजी लपून राहिलेली नाही. हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरपासून थेट वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आज 26 जानेवारीनिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमासाठी हसन मुश्रीफ वाशिमला पोहोचले. मात्र, शासकीय ध्वजरोहणाचा कार्यक्रम पार पडताच कोणतीही बैठक न घेता त्यांनी थेट पुन्हा कोल्हापूर गाठलं आहे. त्यामुळे मुश्रीफ यांची खदखद अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कार्यक्रम संपल्यानंतर तत्काळ कोल्हापूरकडे रवाना
वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर ते तत्काळ कोल्हापूरकडे रवाना झाले. त्यांच्या दौऱ्यात कोणत्याही प्रशासकीय बैठकांचा समावेश नसल्याने पालकमंत्रीपदावरील त्यांची नाराजी अद्याप कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याबाबत चिंता व्यक्त केली. जिल्हा लहान असला, तरी शेतीप्रधान जिल्हा असून, उपेक्षित ओळख पुसून विकासासाठी अधिक गती देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याचा निर्णय घेतला
पालकमंत्री पदावरील नाराजीच्या मुद्द्यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले की, “मी यावर योग्य वेळी योग्य ठिकाणी व्यक्त होणार आहे. अजित पवार यांच्याशी याविषयी चर्चा केली असून, श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.” दरम्यान, शरद पवार यांच्या तब्येतीविषयी हसन मुश्रीफ यांनी चिंता व्यक्त केली.त्यांना कफ आणि आवाज बसल्यामुळे अशक्तपणा जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. वाशिम जिल्हाला लागलेला झेंडा टू झेंडा पालकमंत्री हा डाग पुसू आणि जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा दिली जाईल, असे आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिले.
हे ही वाचा :
एस. टी च्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .