नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री म्हणजे १५ फेब्रुवारी २०२५ रोजी चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. नवी दिल्लीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १६ वर ही सगळी घटना घडल्याचं समोर आलं आहे. प्रयागराजला जाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर आले होते आणि त्यामुळे हा सगळं गोंधळ झाला. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे.
संजय राऊत म्हणाले,” दिल्लीला प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर जी अव्यवस्था कुंभच्या निमित्ताने सरकारने दाखवली आहे. त्याचे बळी आज दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर झाले सरकारी आकडा तीस आहे, माझी माहिती आहे किमान १२० ते १५० लोक तिथे चेंगराचेंगरीमध्ये तुडवून मरण पावले आहेत. सरकार आकडा लपवत आहे. महाकुंभाला जाण्यासाठी ज्या पद्धतीने निमंत्रण दिला जात आहे. भाजपकडून हा जणू काय भाजपचा सोहळा आहे. लोकांना भ्रमित केला जात आहे. तुम्ही फक्त या तुमच्यासाठी गाड्या, घोडे, जेवण, राहण्याची व्यवस्था सर्व काही होईल, पण तसं काही नाही. इतकी अवस्था कोणत्याच कुंभमध्ये झाली नव्हती, काल योगी म्हणत होते ५० कोटी लोक आले पण मेले किती ते सांगा? सात हजाराच्या वर लोक बेपत्ता आहेत हे माहिती आहे का? आपल्याला एकतर ते चेंगराचेंगरी मध्ये मरण पावले किंवा तिकडे अन्य कारणाने मरण पावले,” असे संजय राऊत म्हणाले.
पुढे संजय राऊत म्हणाले, “आज दिल्लीला चेंगराचेंगरी झाली, शंभरच्यावर मरण पावली ही माझी माहिती, सरकार हा आकडा सांगायला तयार नव्हते. दिल्लीतल्या रेल्वेच्या प्रशासनाने अधिकाऱ्याने अचानक त्यांच्या तोंडातून बाहेर पडला आणि हा आकडा समोर आला. तुम्हाला थोडीही माणुसकी नाही, प्लॅटफॉर्मला गर्दी उसळली आहे हे चार दिवसापासून आपण पाहत आहोत. मध्यप्रदेशमधून किंवा उत्तरप्रदेशमधून प्रचंड प्रमाणात लोंढेच्या लोंढे निघाले आहेत आणि तुमचा त्यांच्यावर नियंत्रण नाही. मोदीजी, राष्ट्रपती देखील जाऊन आले. कुंभला मोठे मोठे उद्योगपती देखील जाऊन आले आणि फोटो पाठवत आहेत. सरकार काय करत आहे?” असा प्रश्न यावेळी राऊतांनी उपस्थित केला.