राज्य सरकारकडून मागील आठवड्यात रविवारी (दि. 18) सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले आहे. रायगडमध्ये अदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे रायगडमध्ये भरत गोगावले आणि नाशिकमध्ये दादा भुसे यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्ती केली होती. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला. दरम्यान पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदे हे नाराज होऊन साताऱ्यातील दरे गावात निघून गेल्याची चर्चा देखील रंगली होती. आता दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ यांना हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. त्यांच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
नरहरी झिरवाळांचं मिश्कील भाष्य
वसमतमध्ये आमदार राजू नवघरे यांच्या वतीने हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आलं होतं. या सत्कारात बोलताना नरहरी झिरवाळ यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलंय की, मी पहिल्यांदा मंत्री झालो, पहिल्यांदा पालकमंत्री झालो. मला इथे आल्यावर समजलं की, माझ्यासारख्या गरिबाला हिंगोली सारख्या गरीब जिल्ह्याचे पालकमंत्री केले आहे. आता मुंबईला गेल्यानंतर वरिष्ठांना विचारणार आहे की तुम्ही गरीबाला गरीब जिल्हा का दिला? असे त्यांनी म्हटले. नरहरी झिरवाळ यांच्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
हे ही वाचा :
एस. टी च्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता