New Delhi Railway Station Stampede : शनिवारी रात्री म्हणजे १५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. नवी दिल्लीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १६ वर ही सगळी घटना घडल्याचं समोर आलं आहे. प्रयागराजला जाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर आले होते आणि त्यामुळे हा सगळं गोंधळ झाला.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर नेमकं काय झालं?
शनिवारी रात्री म्हणजे १५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीच्या घटनेत मृतांचा आकडा १८ पर्यंत पोहोचला आहे. तर यात अनेक जण जखमीसुद्धा आहेत. प्रयागराजला जाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर नवी दिल्लीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १६ वर जमले असताना दिल्ली स्टेशनवरून प्रयागराजला जाणारी गाडी (Kumbh Mela special trains) पकडण्यासाठी गर्दी उसळली होती. त्यातच प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाली. यानंतर स्टेशनवरील प्रवासी एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघाले. तर या घटनेत २० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये १० महिला, ४ पुरुष आणि ५ मुले आहेत. या घटनेमध्ये सर्वाधिक ९ जण बिहारमधील असून ८ जण हे दिल्लीतील आहेत. तर १ जण हरियाणामधील आहे. दरम्यान, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर अचानक झालेली गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
एलएनजेपी रुग्णालयाने मृत व्यक्तींची बातमी दिली आहे. सुरवातीच्या वेळेस १४ जण दगावल्याची बातमी समोर आली होती. मात्र आता हा आकडा हळू-हळू वाढत आहे. पोलीस आयुक्तांनी (रेल्वे पोलीस) सांगितले की, जेव्हा प्रयागराज एक्सप्रेस ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर उभी होती, तेव्हा तिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस उशिराने धावत होत्या आणि या गाड्यांमधील प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक १२,१३ आणि १४ वर देखील उपस्थित होते. ते म्हणाले, रेल्वे दर तासाला १५०० जनरल तिकिटे विकत होती, त्यामुळे स्टेशनवर गर्दी वाढली.